Wednesday, January 22, 2014

भाजपचा `दिग्विजय'


                                                                भाजपचा `दिग्विजय' 

 माझा एक सख्खा मित्र ज्योतिषी आहे तर दुसरा तितकाच सख्खा मित्र अत्यंत बुद्धीप्रामाण्यवादी. ते दोघे एकमेकांचे कट्टर वैरी. मी आपला दोघांनाही सांभाळून असतो  दुसऱ्याला खोटे पाडण्यासाठी, दुसऱ्याच्या तत्वांची हुर्यो करण्यासाठी दोघेही सतत आटापिटा करत असतात. `विज्ञान, मानवी बुद्धी आणि लॉजिक' किती तोकडे पडते ते पहिला सांगत फिरत असतो. याउलट पाहिल्याचे भाकित चुकून  कधी खरे ठरले तरी दुसरा त्यात `लॉजिक'च कसे होते, घडले ते `विज्ञानानुसारच' कसे घडले ते पटवू पाहतो. मी आपला सामान्य माणूस असल्यामुळे त्यातले काहीच कळत नाही, त्यामुळे मी फक्त त्या दोघांचे भांडण व त्यांचे एकमेकांसमोर येणे टाळायचा प्रयत्न करत असतो. दुसऱ्याच्या समोर मी कधीही मान्य केले नसले तरी एक गोष्ट मात्र कबूल करावी लागेल की अधून-मधून पहिल्याने वर्तवलेले अत्यंत उटपटांग भविष्य खरे ठरलेले पाहून मी सुध्दा चक्रावलो आहे. उदा. मागे एकदा त्यानं असं भाकित केलं की "भारतीय जनता भ्रष्टाचार निर्मुलनासाठी मेणबत्त्या लावेल".  तेंव्हा मला कळेच ना की भ्रष्टाचार आणि  मेणबत्त्यांचा संबंध काय? पण नंतर जेंव्हा भारतभर लोक `मी अण्णा हजारे' असे छापलेल्या टोप्या लावून मेणबत्त्या लावून फिरले तेंव्हा मात्र भाकित खरे ठरले हे पटले. दुसरा मात्र म्हणत राहिला की "अशा माकडचेष्टांनी भ्रष्टाचार निर्मुलन होणे अशक्य आहे  आणि प्रत्यक्षात झालाही नाही." वगैरे वगैरे. `भ्रष्टाचार' भले न जावो पण तरीही `मेणबत्त्यांचे' भाकित खरे ठरले होतेच ना!! त्यामुळे मला याला भाकित म्हणावे की `लॉजिक' हा उलगडा मात्र झालाच नाही. असेच पूर्वी एकदा पहिल्याने सांगितले की, यापुढे भारतात अत्यंत गरीब जनतादेखील फक्त कोट्याधीश -अब्जाधीशांना आमदार-खासदार म्हणून निवडून देईल. तेंव्हाही दुसऱ्याने या त्याच्या भाकिताला  त्याच वेळी आक्षेप  घेऊन म्हटले,"अरे,  निवडणुकीत तिकीट मिळवण्यापासून मतदानापर्यंत इतके पैसे खर्चावे लागतात की कोट्याधीश-अब्जाधीशच निवडणूक जिंकू शकतो.  त्यामुळे तुझे भाकित हे भाकित नसून निव्वळ `लॉजिक' आहे!!". त्यानंतरचे निवडणुकीचे निकाल पाहून भाकित की लॉजिक हा माझा गोंधळ मात्र दूर झालाच नाही.

काल हा माझा पहिला मित्र अचानक समोर उभा ठाकला. आणि म्हणाला, "एकवीसशे चौदा साली भारतात निवडणुका होतील, त्यात भ्रष्टाचार, महागाई आणि विकास हे प्रमुख मुद्दे असतील. आणि त्यावर्षी भाजप दिग्विजय सिंहांचा पुतळा उभारेल." आतापर्यंत हा माझा मित्र पुढच्या पाच-सात वर्षांचं भविष्य सांगत असे, याखेपेस त्यानं थेट शंभर वर्षांची मजल मारली हे पाहून मी दचकलोच. जेंव्हा नजीकच्या काळाचे भविष्य तो सांगत असे तेंव्हा त्यात `लॉजिक' असण्याची खात्री नसली तरी तशी शक्यता मलादेखील वाटत असे. पण याखेपेला शंभर वर्षांचा प्रश्न असल्यामुळे मला यात लॉजिक नसून शुध्द भविष्य आहे याची बालंबाल खात्री पटली. एकदाचा माझ्या मनातला गोंधळ दूर झाल्यामुळे बऱ्यापैकी आत्मविश्वासानं मी दुसऱ्याकडे गेलो आणि त्याला हे भविष्य सांगून टेचात म्हणालो,
 "आता बोल, यावर तुझं काय म्हणणं आहे?" त्यानं तोंडातल्या तंबाखूची पिचकारी मारून पुन्हा नेहमीचं उत्तर दिलं,
"हे कसलं भविष्य? सिम्पल लॉजिक आहे?" भविष्यावर मारलेल्या  पिचकारीचा मला रागच आला आणि जरा आक्रमकपणे म्हणालो,
"नुसत्या पिचकाऱ्या मारून काही होत नाही. तुला ते लॉजिक खुलासेवार मांडून सिद्ध करावं लागेल." यावर त्यानं पाणी घेऊन खळखळून चूळ भरली आणि म्हणाला,
"अरे, आता दोनहजार चौदा साली निवडणूक होणार आहे. दर पाच वर्षांनी निवडणूक होते, याचा अर्थ विसावी निवडणूक शंभर वर्षांनी, एकवीसशे चौदा साली असेल इतकं साधं गणित आहे. दुसरं, भारतीय जनता स्वत:च इतकी भ्रष्ट आणि नादान आहे, की भ्रष्टाचार, महागाई हे कुणाचीही कितीही सरकारं आलीत तरी भारतातून कधीच जाणार नाही आणि विकास कधीही होणार नाही. त्यामुळे हे मुद्दे शंभर वर्षांनी देखील चालूच असतील, हे सांगायला काही ज्योतिषशास्त्र लागत नाही `लॉजिक' लागतं." त्याचं उत्तर मला काहीसं पटायला लागलं. म्हणून स्वत:ला सावरत त्याला निरुत्तर करणारा माझा जमालगोटा प्रश्न विचारला,
"पण मग भाजप त्यावेळी पुतळा का उभारेल?"
"ती त्यांची पध्दतच आहे. आता नाही का सरदार पटेलांचा पुतळा उभारणार आहेत ते?" तो दात कोरत म्हणाला. त्याचं म्हणणं मला आणखी थोडं पटायला लागलं. पण मन पराभव पत्कारेना. म्हणून विचारलं,
"पण पुतळा ते कॉंग्रेसच्या नेत्याचा उभारतील हे कशावरून?"
"आतासुध्दा ते सरदार पटेलांचा, म्हणजे कॉंग्रेसच्या नेत्यांचाच उभारताहेत की. !!" हे मला बऱ्यापैकी मान्य झालं, पण पूर्ण नाही.
"पण कॉंग्रेसच्या नेत्यांचाच पुतळा उभारणार असतील तर मग इंदिराजींपासून सोनियाजींपैकी कोणाचा का नाही?"
"नाही. ते शक्य नाही. गांधी नाव असलेल्या व्यक्तीचा पुतळा ते उभारत नाहीत त्यांच्या शिष्यांचा उभारतात. आतादेखील ते महात्मा गांधींचा पुतळा कुठे उभारताहेत? गांधीजींच्या शिष्याचा, म्हणजे सरदार पटेलांचा उभारताहेत. गांधीजींचा नव्हे."  माझ्या शंका फिटत आल्या होत्या. तरी एक प्रश्न विचारल्या शिवाय राहवेना म्हणून विचारलं,
"पुतळेच उभारायचे असतील तर भाजप स्वत:च्या पक्षातल्या नेत्यांचे का नाही उभारत?"
"पुतळा उभारावा अशा लायकीचे नसतील कदाचित कोणी त्यांच्यात. मग काय करतील बिचारे? पण ते जाऊ दे, मुद्दा असा की ज्योतिष-बितीष सगळं थोतांड आहे. माहिती आणि लॉजिकचा वापर करून हे लोक पुढे काय घडेल ते ओळखतात आणि सर्वात महत्वाचं असं आहे की शंभर वर्षांनी काय घडणार आहे ते तपासायला तू, मी आणि तो भंपक ज्योतिषी असणार आहोत कुठे?"
हे ऐकून मीच पुतळ्यासारखा थिजलो...............
 लोकेश शेवडे

चॉकलेट्स आणि कोको

चॉकलेट्स आणि कोको 
 
वाईट सवयींमुळे, व्यसनांमुळे केवळ त्या व्यक्तीचे आयुष्यच बरबाद होते असे नाही तर त्या व्यक्तीचे कुटुंब, समाज, देश या सर्वांवर गंभीर परिणाम होत असतात हे एखाद्या मूर्खालादेखील समजू शकते, त्यामुळे लोकप्रतिनिधींना समजणारच. याबाबत लहानपणापासूनच मुलांना सांभाळलं पाहिजे, अन्यथा त्यांना चटकन चित्र-विचित्र सवयी लागतात, परिणामी पुढची पिढी अत्यंत रोगट निर्माण होते हे देखील सर्वांना समजले पाहिजे.    हल्लीच्या लहान मुलांना चॉकलेट्स शिवाय चालतच नाही. आमच्या काळात असं नव्हतं. लहान मुलांना आम्ही चॉकलेट्स अज्जिबात देत नसू. आम्हीच नव्हे त्याकाळी मुलांना चॉकलेट्स कोणीच देत नसत. अर्थातच, मुलांना चॉकलेट्स नाकारण्यामागे कारण म्हणजे मुलांचे दात किडणे. सर्वेक्षणात असे आढळून आले की लहानपणी चॉकलेट्स खाणाऱ्या मुलांपैकी २९ की  ३९ टक्के मुलांचे दात नंतर किडतात. आता, ही टक्केवारी किडक्या मुलांची, सॉरी, किडक्या दातांच्या मुलांची की निव्वळ किडक्या दातांची, त्यात २९ टक्के बरोबर की ३९ टक्के असे बरेच वाद होते ही गोष्ट अलाहिदा!![ इंग्रजीत लहान मुलाला `कीड' म्हणतात त्याचे कारण ती मुले चॉकलेट्स खातात हे असावं की काय कुणास ठाऊक.] पण, हे गोड खाणं, चॉकलेट्स खाणं यामुळे लहान मुलांवरच नव्हे तर म्हाताऱ्यांवरदेखील गंभीर परिणाम होतो हे निश्चित. मुलांचे दात किडतात आणि म्हाताऱ्यांचे तर पाहायलाच नको,  म्हणजे आपण नव्हे, त्यांनीच पाहायला नको, आय मीन, ते पाहूच शकत नाहीत कारण गोड, चॉकलेट्स खाऊन मधुमेहानं त्यांचे डोळेच जातात. त्याखेरीज किडनी, हृदय वगैरेवर परिणाम आणि पायाला गॅगरीन हे सारे वेगळेच!!! आज मधुमेहींची संख्या इतकी वाढली आहे की … जाऊद्या. 

हे सारं आठवण्याचं कारण म्हणजे, परवा एका ठिकाणी एक आजोबा आणि एक नातू असे एक दुकानाबाहेर उभे राहून चॉकलेट्स खाताना पाहिले. अविर्भावावरून त्या आजोबांचे डोळे आणि नातवाचे दात गेलेले वाटत होते…त्या आजोबांचा मुलगा, म्हणजे नातवाचा बाप, असा तो बाप कम मुलगा, हतबल कम हताशपणे त्या दोघांचे चॉकलेट्-चर्वण पाहात उभा होता! दरम्यान आजोबांनी आणखी चॉकलेट्स विकत घेण्यासाठी खिशातून पैसे काढले. एवढ्यात एक गुंड धक्काबुक्की करत नातवाला ढकलून देऊन आजोबांकडील नोटांचे आख्खे बंडल घेऊन पळून गेला. `चोर, चोर, पकडा पकडा' असा गिलका करत गर्दी जमा झाली आणि चोर पळून गेल्याच्या दिशेनं हातवारे करत सर्वांनी त्या तिघांभोवती असं कोंडाळं केलं की जणू आजोबा म्हणजे `आयटम गर्ल'!! इतक्यात ती गर्दी पाहून एक शुभ्र वस्त्रांकित, महाकाय तिथे अवतरला आणि त्यानं त्या साऱ्या गर्दीचे लक्ष त्या तिघांकडून काढून स्वत:कडे वेधून घेतलं. त्याचा वर्ण असा विलक्षण होता की त्याच्या चेहऱ्यावर गॉगल आणि केस वेगळे कळतच नव्हते. त्याला पाहून लगोलग चार फूट उंच, दीड फूट व्यासाचा एक कॉन्स्टेबलही अचानक कुठूनतरी तिथे उपटला आणि त्यानं लागलीच मोबाईलवरून अर्धा फूट मिशीवाल्या त्याच्या `पीआय' साहेबालाही बोलावून घेतलं. त्या `लक्षवेधी'च्या पांढऱ्या-फटक कपड्यांवरून तो नेता असावा हे कळत होतंच पण त्याच्या जरबयुक्त स्मितहास्यामुळे  तो तेथील लोकप्रतिनिधीच असावा हे सर्वांनीच ताडलं आणि गर्दीतला प्रत्येकजण चेहऱ्यावर निखळ  ओशाळपण आणून त्याच्याशी बोलू लागला. त्या इन्स्पेक्टरनं त्या `ब्लाक एंड व्हाइट' `होल्डॉल'साठी आणि  स्वत:साठी त्याच दुकानातल्या खुर्च्या उचलून आणून तिथंच जाब-जबाब घेणं सुरु केलं.
"कुठं राहता? कशासाठी आलात इथं ? खिशातून पैशे बाहेर का काढले?"- त्यानं प्रश्नांचा गोळीबारच सुरु केला. प्रत्येक प्रश्नानंतर तो मिशीवर बोटे फिरवत त्या पांढऱ्या-कुट्ट पेहरावाकडे  दाद मिळवण्याप्रित्यर्थ पाहत होता. त्यावर तो नेताही स्वत:च्या बोटातील सोन्याची जाड अंगठी फिरवत नितांत वाणिज्य दाद द्यायचा. इन्स्पेक्टर अशा अविर्भावात प्रश्न विचारायचा की गर्दीतल्या नवीन लोकांना ते तिघंच चोर वाटत होते.
"नोटांचे नंबर माहित आहेत का? नोटा ओळखू शकाल का?" 
"नाही"  
"निदान चोराला ओळखाल का? त्याला आधी कधी कुठं पाह्यलं होतं का?" या प्रश्नांवर तिघांनीही नकारात्मक मान डोलावली हे पाहताच इन्स्पेक्टरनं  चिडून हातातली छडी आपटली. दचकून म्हातारा म्हणाला,
"मी कसं पाहणार? मला दिसतच नाही. माझे डोळे मधुमेहानं गेलेत" 
"दिसत नाही तर मग घरात बसायचं!! इथं कशाला आलात? बरं, आलात ते आलात, वरून एवढ्या नोटा कशाला बाहेर काढल्या?" इन्स्पेक्टरने म्हाताऱ्याला खडसावलं. 
"चॉकलेट्स खरेदीसाठी आलो होतो आणि चॉकलेट्सचे पैसे देण्यासाठी  बटवा खिशाबाहेर काढला होता" हे म्हाताऱ्यानं सांगितल्यावर इन्स्पेक्टर आक्रसला पण ते कृष्ण-धवल गाठोडं मात्र विस्कटलं!
"म्हणजे, मधुमेहानं डोळे गेले तरी  चॉकलेट्स खाताय?? अहो आजोबा तुमचं वय काय आणि खाताय काय? आपल्याला झेपतं तेच आणि तेवढंच खावं माणसानं!!!" मग त्याच्या नातवाकडे वळून ओरडला, "काय रे पोरा? दात किडले तुझे तरी खातोस का  चॉकलेट्स?? लाज नाही वाटत का एवढा गोरा असून काळे दात घेऊन फिरायला?" ओरडताना नेत्याच्या चेहऱ्यातून त्याचे पांढरे दात, रस्त्याच्या कडेचे पांढरे दगड काळोखात जसे दिसतात तसे दिसत होते.    
"इन्स्पेक्टरसाहेब, आम्ही मध्यमवर्गीय लोक आहोत, दहाहजार रुपये गेलेत, त्या चोराला पकडा साहेब, तो लांब गेला नसेल अजून" मधली पिढी इन्स्पेक्टरच्या विनवण्या करायला लागली. 
"चोराला पकडणं म्हणजे काय सोपं वाटलं काय तुम्हाला, चॉकलेट्स खाण्यासारखं? चोराला पकडा म्हणे! इथे सबंध एरियासाठी मी एकटा पीआय! काय काय सांभाळायचं आम्ही?" त्या तिघांना झापता झापता तो अचानक त्या श्वेतवस्त्रावृताकडे वळून आवाजात मार्दव आणत म्हणाला,  "साहेब, एक जीप तरी अर्जंट वाढवून घ्यायला पाहिजे आपल्या एरियासाठी. तुम्ही सांगितलं मंत्रीसाहेबांना तर होऊन जाईल साहेब. तुमच्या सभा-मोर्च्याच्या कामी येईल." थोडं थांबून अतीव लाचारीनं ओथंबलेल्या आवाजात म्हणाला, " बदलीचं लवकर बघा ना साहेब, तुमचं ठरलेलं उद्याच पोचवतो. पण काम करून द्या." यावर तो अजस्त्र देह गॉगलच्या कोपऱ्यातून इन्स्पेक्टरकडे पाहात म्हणाला,
" उद्या, उद्या करताय नुसतं! आमच्या बिल्डींगमधले भाडेकरूसुध्दा हुसकले नाहीत अजून!"
"साहेब, उशीर झाला तर चोर सापडणार नाही हो …. साहेब!!" बाप कम मुलगा आर्जव करू लागला.   
"हा,… आम्ही चोरांना पकडायचं आणि पैसे परत मिळाले की तुम्ही परत चॉकलेट्स खायचे!!! मग परत तिथे चोर येणार!! दुसरं काही कामच नको करायला" इन्स्पेक्टर मिशा पिळत म्हणाला. मग ठेवणीतल्या नम्रपणानं अंगठीवाल्याला म्हणाला, "अशा लोकांमुळेच चोरांचं फावतं साहेब!! चॉकलेट्ससाठी आख्खं बंडल कशाला काढायचं?"
अंगठीधारकानं गॉगल काढून पुसला आणि खड्या आवाजात म्हणाला,
"चॉकलेट्समुळे पैसे चोरीला गेले ते गेलेच, शिवाय चॉकलेट्स खाऊन यांचे डोळे गेले, त्या पोराचे दात गेले ते आणखी वेगळेच!! त्यासाठी पुन्हा डॉक्टर, हॉस्पिटल, खर्च … त्याचं काय??" त्यानं संपूर्ण गर्दीकडेपाहून प्रश्नार्थक चेहरा केला. या प्रश्नानं  सारे थक्क होऊन आपल्या लोकप्रतिनिधीकडे कौतुकाने पाहायला लागले. त्यानं पुन्हा गॉगल लावला आणि आवाज वाढवून म्हणाला, "म्हणजे पुन्हा तुम्ही आम्हालाच म्हणणार, सरकारनं हॉस्पिटल काढावं, मोफत डोळे, दात तपासावे, मोफत उपचार करावे …. काय आजोबा??" या प्रश्नानं तर आता सारे अवाकच झाले. आता तो उत्तेजित होऊन उभाच राहिला आणि भाषण दिल्यासारखे बोलू लागला, 
`चॉकलेट्समुळे पुढच्या पिढीचे भविष्य किडतंय हे चॉकलेट्समुळेच आधीची पिढी पाहू शकत नाही!!!" या वाक्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला. लोक एकमेकांशी कुजबुजत आपापल्या मुलांच्या, आई-बापांच्या अशाच तक्रारी सांगून त्यामुळे होणाऱ्या समस्यांची व खर्चाची कबुली देऊ लागले,जणू त्या नेत्यानं जनतेच्या वेदनेलाच वाचा फोडली होती. त्याचा आवाज आणखी वाढला,
"या दोनही पिढ्यांची आज दारुण अवस्था दिसतेय ती फक्त चॉकलेट्समुळेच!!! हे थांबवायचे असेल तर चॉकलेट्स खाणे थांबले पाहिजे!! म्हणून मी चॉकलेट्स विक्रीवर बंदी आणावी यासाठी संबंधित मंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवून पुढच्या अधिवेशनात `बंदी विधेयक' मंजूर करून घेईन.!!!" यावर टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होऊन तो थांबेच ना, गर्दी वाढतच होती, तो बाप कम मुलगा अधूनमधून क्षीण आवाजात चोरीबद्दल इन्स्पेक्टरकडे विचारणा करत होता. त्याला टाळून इन्स्पेक्टर गर्दीला छडीने आवरत होता. तेवढ्यात त्या गर्दीमुळे तिथे एक `ओबी' वाहन आले आणि त्यातून एक युवक हातातल्या कॅमेरा व माइकसकट हातवारे करत उतरला. त्यानं `रोजचा बकवास'कडून आल्याचं सांगून नेत्याला `बोला बोला' म्हणत प्रश्न विचारला,    
" साहेब, राजकारण्यांचे घोटाळे, भ्रष्टाचार, गुंडगिरी हे कसे थांबवणार ते बोला !! कायदा, सुव्यवस्था ढासळली आहे त्याबाबत बोला." कॅमेरा पाहून नेता चेकाळला आणि उच्चारवात म्हणाला,
"आपल्या राज्यात कायदा-सुव्यवस्था ढेपाळली म्हणून काय झालं? लोकप्रतिनिधींचे घोटाळे ,भ्रष्टाचार बंद केले नसले तरी आपल्या सरकारनं आतापर्यंत डान्स बार, हायवे-साईड बार, गुटखा, मावा, खर्रा या सर्वांवर  बंदी आणली आहे. या बंदीला विरोधी पक्षांनीसुध्दा विरोध न करता एकमतानं विधेयक मंजूर केलं हे लक्षांत घ्या. गुंड आणि भ्रष्टाचाऱ्यांना आम्ही काही करू शकलो नसलो तरी सामान्य जनतेला आम्ही निर्व्यसनी आणि नैतिक बनवतो आहोत, जेणेकरून भविष्यात आपोआपच त्यांचे प्रतिनिधी नैतिक बनतील, ज्यामुळे पुढे कधी ना कधी गुंडगिरी, घोटाळे आणि भ्रष्टाचारापासून राज्य मुक्त होईल!!" आता लोक खुशीनं  पिसाटून घोषणा देऊ लागले आणि मोठ्ठा कल्लोळ माजला. बाप कम मुलग्याने छडीपासून बचावण्यासाठी इन्स्पेक्टरचा नाद सोडून नेत्याला गाठून विचारले,
"साहेब, माझे दहाहजार रुपये चोरीला गेलेत, त्याचं काहीतरी करा ना!" 
नेत्यानं  गॉगल काढून त्याच्याकडे रोखून पाहत म्हटलं,
"अहो काळजी कसली करताय? ही नवी बंदी आली की तुमचे वडील आणि  मुलगा चॉकलेट्स खाऊ शकणार नाहीत. म्हणजे पुढच्या औषध-पाण्यासाठी तुम्हाला खर्चच पडणार नाही. अन्यथा काही दिवसातच  हॉस्पिटल, डॉक्टर, औषधे यांच्यावर तुमचे लाखो रुपये खर्च झाले असते, दहा हजार रुपयांचं काय एवढं घेऊन बसलात?"

हे सारं पाहून, आमच्या काळात राजकारणात भ्रष्टाचार, गुंडगिरी वगैरे काही नव्हतंच, याचं कारण उमगलं, की त्याकाळी डान्स बार, गुटखा, खर्रा वगैरे असलं काही नव्हतंच. समाज जर नैतिक आणि निर्व्यसनी असेल तर त्यांचे प्रतिनिधी देखील साहजिकच सज्जन असणार, मग भ्रष्टाचार, गुंडगिरी निर्माण होईलच कशी? आमदारांना मानधन-भत्ता-निधी वाढवणे आणि मुंबईत स्वस्त सदनिका देणे याखेरीज कधीही यापूर्वी सरकार आणि विरोधक एकत्र आले नव्हते. आता सरकार आणि विरोधक वगैरे सर्वांनी एकमताने समाजाला निर्व्यसनी आणि नैतिक बनवण्याचा चंग बांधला आहे, ही किती भाग्याची गोष्ट आहे!! समाज सुधारला की  पुढे कधीतरी त्यांचे प्रतिनिधी सुधारतीलच आणि मग अंतिमत: गुंडगिरी-भ्रष्टाचार देखील नष्ट होईलच. आमच्या काळात मुलांना केवळ चॉकलेट्स नव्हे, तर चहादेखील दिला जात नसे, फारतर कोको दिला जाई. सरकार आणि विरोधक आता अनायासे समाजसुधारण्यासाठी एकत्र आले आहेतच, तर मग सरकारनं वृध्द आणि मुलांच्या चॉकलेट्स खाण्यावर तर बंदी आणावीच, पण चहावरदेखील बंदी आणावी. चॉकलेट्स व चहाबंदीची ही विधेयके येतील तेंव्हा येतील, पण तोपर्यंत मंत्रालयात, निदान अधिवेशनकाळात चहापान बंद करून कोको सुरु करायला काय हरकत आहे? एवीतेवी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी विरोधकांचा चहापानावरच बहिष्कार असतो. विरोधकांनी अधिवेशनाआधीच या चहाबंदी विधेयकास कृतीद्वारे पाठींबा दिला असे समजून सत्ताधाऱ्यांनी कोको प्यायला सुरु करावे!!! आधी विधेयक मांडून नंतर पाठींबा देण्याची पध्दत असली तरी चांगल्या गोष्टीसाठी आधी पाठींबा आणि नंतर विधेयक असे करण्यात वावगे काय??     
           
लोकेश शेवडे 
२५. ७. २०१३ सायं ६.००