Friday, April 25, 2014

एसटूबीटू

   एसटूबीटू
 
मी ५/६ वर्षांचा असताना जेंव्हा मला वाचता येऊ लागलं तेंव्हा माझ्या वडलांनी रोज माझ्यासमोर वर्तमानपत्रे ठेवायला सुरुवात केली. त्यांचा उद्देश असा की रोज फक्त गोष्टीची पुस्तके वाचण्याबरोबरच हळूहळू वर्तमान देखील जाणण्याची सवय लागावी. त्या वयात वर्तमानपत्रे वाचून मला काय  कळणार  होते [आज तरी काय कळते, म्हणून फक्त `त्या वयाला' दोष द्यावा?]?? हा प्रश्न अलाहिदा. बाकी काही कळो  न कळो पण, तेंव्हापासून `सामान्य माणूस' हा  शब्द प्रयोग रोज माझ्या वाचनी येऊ लागला. साहजिकच हा `सामान्य माणूस' म्हणजे नेमका कोण? हा प्रश्न मला तेंव्हा पडला.  या प्रश्नाचे समाधानकारक  उत्तर मला कोणी दिले नाही, पण काही वर्षानंतर आमच्याकडे टाईम्स येऊ लागला तेंव्हा लक्ष्मणच्या व्यंगचित्रामध्ये नेहमी एक धोतर, कोट आणि चष्मा  लावलेला माणूस असतो, तो कोण? असा प्रश्न विचारल्यावर `तो' सामान्य माणूस आहे असे मला वडलांनी सांगितले. लक्ष्मणने रेखाटलेला तो प्रतिकात्मक  `सामान्य माणूस' पाहून मौज वाटली. पण तरीही त्या चित्रामुळे प्रत्यक्षातला सामान्य माणूस कोण, याबद्दलचे कुतूहल काही कमी झाले नाही. पुढील  आयुष्यात अक्षरश: रोज सकाळ-संध्याकाळ `सामान्य माणसाला अमुक वाटतंय, सामान्य माणसाला तमुक वाटतंय, सामान्य माणसाला अमुक नकोय, सामान्य  माणसाला  ढमुक हवंय, सामान्य माणसाच्या  मनात संताप आहे, सामान्य माणसाच्या मनात प्रेम आहे' असे कोणी ना कोणी फेकलेले संवाद कानावर  आदळत राहिले.  हे संवाद ऐकले की प्रत्येक वेळी मला बोलणाऱ्याची कॉलर पकडून त्याला विचारावसं वाटतं, की "तू उठसूट ज्याचा संदर्भ देतोयेस तो सामान्य माणूस  कोण? एकदा दाखव तर खरा तो तुझा सामान्य माणूस!!" काही लोकांच्या बोलण्याची सुरुवात तर चक्रावून टाकणारी  असते.  उदा.  "माझ्यासारख्या एका  सामान्य माणसाला…" आणि मग यापुढे कोणत्याही प्रकारचे, कोणत्याही अर्थाचे शब्द, विधाने येतात. गम्मत अशी, की ही विधाने झोपडपट्टीमधल्या जीर्ण  कपड्यातल्या  माणसापासून चकचकीत कोऱ्या मर्सिडीज  बेंझ मधून सुटाबुटात फिरणाऱ्या माणसापर्यंत कोणाच्याही तोंडून स्रवताना ऐकू येतात. अशा  वैविध्यपूर्ण लोकांच्या तोंडून ही विधाने ऐकून प्रथम गोंधळायला झाले तरी नंतर `हा जो कोणी सामान्य माणूस असेल, तो त्यांच्यासारखा असेल' असा  समज मात्र झाला.  म्हणून अशी विधाने करणाऱ्या लोकांनाच विचारणा केली तेंव्हा लक्षात आले की त्यांच्या`सारखा' म्हणजे सूटबूट घालून मर्सिडीजच्या  मागच्या सीटवर आपल्या लेडी पीएशी `त्यांच्यासारखे' चाळे करणारा नव्हे किंवा बायकोच्या कष्टाच्या पैशांवर  दारू पिऊन बायकोलाच `त्यांच्यासारखा' मारणारा नव्हे, रिक्षा-टेक्सीच्या मीटरमध्ये  फेरफार करून पैसेंजरना लुटणारा नव्हे किंवा बाल्कनी अवैधपणे एन्क्लोज करून महापालिकेचा कर बुडवणारा नव्हे, मुलाच्या लग्नात सुनेकडून `त्यांच्यासारखा' हुंडा घेणारा नव्हे किंवा बारगर्लवर  `त्यांच्यासारखा' दौलतजादा करणारा नव्हे ……ते स्वत: जरी अगदी तस्सेच असले  तरी त्यांच्या मते सामान्य माणूस म्हणजे कधीही-कोणतेही गैरकृत्य करणारा नव्हे… तर  सामान्य माणूस म्हणजे वट्ट `साधा-सरळ, भोळा-भाबडा'! हल्लीच्या  भाषेत बोलायचे तर सामान्य माणूस म्हणजे `S२-B२'  म्हणजे एसटू बीटू!! हा झाला सामान्य माणसाच्या मानसिकतेचा उलगडा!  
 
 
सामान्य माणसाच्या मानसशास्त्रीय उलगडा होण्याबरोबरच आणखी एक उलगडा असा झाला की, या एसटूबीटूचा एक गुणधर्म असा आहे की तो नेहमी पीडीतच  असतो. तो जर पीडीत नसेल तर त्याचे एसटूबीटूत्व काढून घेण्यात येते. उदा. एखाद्या रांगेत २५ लोक काहीतरी घेण्यासाठी उभे आहेत. त्यातील २४ लोकांना  जे पाहिजे ते मिळाले आणि एकाला नाही मिळाले तर तो `न मिळालेला' एक हा सामान्य माणूस, सॉरी, एसटूबीटू ठरतो आणि ज्यांना मिळाले ते २४ जण त्या `न मिळालेल्या' माणसापेक्षा गरीब, दुबळे किंवा अपंग असले, तरी त्यांना `सामान्य'त्व मिळत नाही. इथे `सामान्यत्व' हे फार  `असामान्य' आहे असे वाटले  तरी ते साफ चूक आहे. कारण, समजा पुढे दुसऱ्या  एखाद्या रांगेत त्या अगोदरच्या `एसटूबीटू'ला हवे ते मिळाले आणि बाकीच्या २४ जणांना नाही मिळाले  तर त्या अगोदरच्या  `एसटूबीटू'चे  सामान्यत्व काढून घेतले जाईल आणि त्या २४ जणांना सामान्यत्व  मिळेल!! इथे हा उलगडा `संख्याशास्त्रीय' वाटत असला  तरी ती दिशाभूल आहे समजून घेतले पाहिजे. कारण २४ असो की १ हे महत्वाचे  नसून `पीडीत' असणे हे वैगुण्य महत्वाचे आहे. म्हणजेच ते  `वैगुण्य' हे एका अर्थी सामान्य माणसाचा `गुण'धर्म आहे. इथे हा उलगडा गुणात्मक वाटत असला तरी त्यात `वैगुण्य' हेच `गुण' ठरत असल्यामुळे  तो  वास्तवात `विरोधाभास अलंकार', म्हणजे `भाषाशास्त्रीय' ठरतो. एकंदरीत, सामान्य माणसाबद्दल जे काही मांडले जाते ते फक्त `अलंकार' आहेत, ते देखील प्रत्यक्षातील नव्हे, तर भाषेतील!!! 
 
 
सामान्य माणसाबाबत मराठी भाषेतील या उलगड्याने दिलेल्या धक्क्यातून  मी सावरतोय न सावरतोय तोच त्याच बाबतीत अचानक हिंदी भाषेनं त्याहून  मोठा धक्का दिला. हिंदीत आंब्याला `आम' म्हणतात असे आम्हाला शाळेत राष्ट्रभाषा शिकलो तेंव्हापासून माहित होते. आणि `आंबा' हा सामान्य  माणसाला  `न परवडणारा' असतो हे अनुभवातून माहित झाले होते, त्यामुळे `आंब्या'चा सामान्यांशी संबंध पूर्णपणे तुटला आहे हे मला ठाऊक झाले होते. पण काही  महिन्यांपूर्वी बातम्यांतून ऐकले की, हल्ली हिंदीत `सामान्य माणसाला' `आम आदमी' म्हणतात!!  म्हणजे, मुळात `सामान्य  माणूस' कोण याचा अद्याप पत्ता  लागलाच नव्हता, त्यात आता त्याला हिंदीत `आम आदमी' का म्हणतात त्याचाही छडा लावायचे  डोक्याला नवीन काम लागले!!!! या साऱ्याचा परिपाक म्हणून गेले काही महिने मी `आम आदमी' म्हणजे कोण? किंवा एखाद्याला `आम आदमी'  का म्हणतात ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. `आम आदमी' बाबत मी अभ्यास सुरु केला तेव्हढ्यात कळले की दिल्लीमध्ये एक `पार्टी' सुरु झालीय आणि तिचे नाव `आम  आदमी' आहे. हे ऐकून मी बेशुध्दच पडलो!
 
 
 
शुद्धीवर आल्यावर मात्र लक्षात आले की  दिल्ली या शहराचा अभ्यास केल्यास आम आदमी कळेल आणि तो कळला की मग फायनली सामान्य माणूस  म्हणजे कोण ते कळू शकेल. अभ्यास सुरु केल्यावर कळले की दिल्ली हे ऐतिहासिक व राजकीय बाबींत एक नंबरचे शहर असले तरी औद्योगिक  वर्तुळात मात्र ते भारतभरात `दोन नंबर'चे शहर मानले जाते. यातील `दोन नंबर' हा अनुक्रम किंवा `शिशु' विहारातील सांकेतिक आकडा नसून `आर्थिक परिभाषेतील' शब्द आहे. उद्योग व व्यापार या दोन्हीबाबत दिल्ली प्रसिध्द आहे, ती `विदाउट बिल', म्हणजे काळ्या पैशांसाठी, म्हणजेच `दोन नंबर'च्या  व्यवहारांसाठी!! दिल्लीत उद्योग-व्यापार किंवा स्थावर व्यवहार मोठ्या प्रमाणात अबकारी कर, विक्रीकर, स्टेंप ड्युटी वगैरे सारे कर बुडवूनच केले जातात आणि  खरेदी करणाऱ्या तिथल्या जनतेलादेखील वस्तू किंवा वास्तू खरेदी करताना कर-बीर भरून खरेदी करायला  आवडत नाही, विदाउट बिल-कमी किमतीत खरेदी करायलाच  आवडते. पालिका बझार, कॅनॉट प्लेसपासून अगदी करोलबाग व जुन्या दिल्लीतील  छोट्या `हट्ट्या'पर्यंत सर्वत्र अशी ही नंबर दोनची  खरेदी-विक्री  अव्याहत सुरु  असते. दिल्लीतील लोकप्रतिनिधींच्या खरेदी-विक्रीबद्दल काय बोलावे?? ते तर टीव्ही-वर्तमानपत्रांमधे रोज वाचत असतो, त्यात खरे किती आणि  खोटे किती कुणास ठाऊक? मात्र अशा व्यवहाराला  दिल्लीत `एक' किंवा `दोन नंबरचा' व्यवहार किंवा पैसा असे म्हणत नाहीत. तर `तीन नंबरचा' व्यवहार  म्हणतात. काळा पैसा हा कर न भरलेला  असला तरी तो त्या  व्यक्तीचा स्वत:चाच असतो. कष्ट करून, उद्योग-धंदा करून मिळवलेल्या स्वत:च्या कमाईवर  कर भरला की तो पैसा `एक नंबर', त्याच कमाईवर कर भरला नाही की तो `दोन नंबर'चा पैसा.  तत्राप, जी मालमत्ता किंवा पैसा मुळात स्वत:चा नाहीच, दुसऱ्यांचा म्हणजे जनतेचा  आहे तो परस्पर  डल्ला मारून त्यावर केलेल्या व्यवहाराला `तीन  नंबरचा' व्यवहार म्हणतात. हे विचित्र असले तरी न समजण्यासारखे मुळीच नाही. शब्द आणि त्यांच्या व्याख्या निर्मितीमध्ये दिल्लीकर  जनतेसमोर पुणेकरदेखील `नंबर दोन'  ठरतील एवढे ध्यानात ठेवले तर पुढचे समजणे सोपे आहे!! किंबहुना दिल्लीकर जनता विक्षिप्तपणातदेखील  पुणेकरांच्या पुढे, म्हणजे संपूर्ण देशात `नंबर एक' आहे. उदा. दिल्लीकर जनता  स्वत:च व्यवहारात नंबर दोनच्या-काळ्या पैशांचा आग्रह धरत असली तरी  हीच जनता दर काही दिवसांनी  त्याच काळ्या पैशांविरुध्द आंदोलन करत रस्त्यावर  उतरते. त्या आंदोलनात का कुणास  ठाऊक पण रस्त्यांवर पथदीप असतांना आणि त्यांचा लख्ख उजेड पडलेला असतांनादेखील ही जनता मेणबत्त्या लावून रस्त्यावर फिरते. त्यामुळे  दिल्लीत मेणबत्त्यांचे उत्पादन व व्यापार  करणाऱ्यांची संख्या  वेगाने  फोफावली आहे. अर्थातच ते  सर्व उत्पादक  व व्यापारी या मेणबत्त्या  विदाउट बिल, म्हणजे `दोन नंबर'च्या  व्यवहारात विकतात. परिणामी आंदोलनकर्ते त्या काळ्या पैशातल्या मेणबत्त्या  विकत घेऊन काळ्या पैशाच्या विरुध्द आंदोलनाचा उजेड  पाडतात!!!असा विक्षिप्तपणा पुणेकर कध्धीच करणार नाहीत. ते खचित मेणबत्त्यांचे पैसे वाचवतील आणि त्या पैशांत `प्रतिकात्मक आंदोलने अयशस्वी का होतात?' यावर एक परिसंवाद आयोजित करतील. असो. 
 
 
कोणत्याही राष्ट्राच्या महसुलाचा काही भाग हा त्याच्या `राजधानी'च्या विकासासाठी आणि सुशोभीकरणासाठी राखीव ठेवलेला असतो. दिल्लीत बहुतांश उद्योजक, व्यापारी, बिल्डर्स आणि जनता कर बुडवत असूनही `दिल्ली' राजधानी असल्यामुळे साहजिकच तिथे सरकारी इमारती, रस्ते, पूल, बगीचे वगैरे सर्व मात्र मुबलक आणि भव्य-दिव्य आहे. याचा अर्थ, भारतभरातील लोक वेगवेगळ्या प्रकारचे कर भरण्याचे  कार्य करतात, त्या करांतून सरकार दिल्लीच्या  विकासाचा, बाग-बगीच्यांचा, सुशोभीकरणाचा आणि तिथल्या ऐतिहासिक वास्तू जतन करण्याचे कार्य करते आणि दिल्लीकर जनता ते सारे वापरण्याचे, उपभोगण्याचे कार्य  करते. एकंदरीत, स्वत: फारसे कर न भरता मोठ-मोठे रस्ते, पूल, बगीचे वगैरेंसकट अनेकविध सुखसोयी उपभोगणे हे दिल्लीकर जनतेचे खास वैशिष्ट्य! थोडक्यात, संपूर्ण भारतातील जनतेच्या कष्टांवर चैन करणे हे दिल्लीतील केवळ राजकारण्यांचाच नव्हे तर बहुतांश  जनतेचादेखील `स्वभाव' आहे.  
 
 
तर मुद्दा असा की, `सामान्य माणूस' कोण? हे समजण्यासाठी मी त्याला हिंदीत `आम आदमी' का म्हणतात ते समजून घेऊ पाहात होतो. तेवढ्यात असे  कळले की दिल्लीत `आम आदमी पार्टी' सत्ताधारी  झाली आणि अगोदरच सारे काही फुकट  मिळणाऱ्या त्या दिल्लीकर जनतेला त्यांनी आता वरून पाणी फुकट आणि वीज स्वस्त द्यायलादेखील सुरुवात केली. हे ऐकून मी पुन्हा एकदा बेशुध्द पडलो. आणि पुन्हा  शुद्धीवर  आल्यावर पुन्हा सामान्य माणसाला `हिंदीत' आम का म्हणतात त्याचा शोध सुरु केला. शोध घेताना एक हिंदी वाक्प्रचार ऐकला, `आम के आम, और गुठलीयोंके दाम' ! अर्थ विचारल्यावर कळले की एखाद्याचे  भाग्य फारच फळफळले की त्याला आंबे फुकट खायला तर मिळतातच पण ते खाल्यानंतर उरलेल्या कोयींचे देखील पैसे मिळतात!! वाक्प्रचाराचे  मर्म कळल्याबरोबर निदान दिल्लीच्या तमाम जनतेला  `आम आदमी' म्हणणेच समर्पक असल्याचे लक्षात आले. त्यावरून उर्वरीत भारतातील भारतीय हा  दिल्लीकरांसारखा `आम' होऊ शकत नाही या गोष्टीचा `दर्द ना जाने कोय' हे देखील ध्यानात आले. पण ज्यासाठी `आम'चा अभ्यास केला तो `आदमी' काही उमगलाच नाही. बालपणापासून मी ज्याचा शोध घेतो आहे तो भारतातला `सामान्य माणूस' कोण? गर्भनिदान करून स्त्रीभ्रूण हत्या करणारा की भक्तांची रांग मोडून लवकर देवदर्शन मिळावे म्हणून पुजाऱ्याला `दक्षिणा' देणारा? स्वत: लठ्ठ पगार मिळवूनही मोलकरणीला मात्र तुटपुंजा पगार देणारा की स्वच्छतेच्या गप्पा मारत प्रत्येक कोपऱ्यात पचकन थुंकणारा ….… स्वत: कर बुडवून, भ्रष्टाचाराविरुध्द बोंबा मारत, सरकारकडून सारे फुकट मिळण्याची अपेक्षा करणारा की धर्मांधतेला आणि जातीयतेला शिव्या घालत स्वत:च्याच  धर्माच्या किंवा जातीच्या उमेदवारालाच मतदान करणारा?? किंवा असाच  कुठलातरी, भारतात जागोजाग आढळणारा….पण नेमका कोण? ………. ते मात्र शेवटी कळले नाही…ते नाहीच.  
 
 
लोकेश शेवडे 
६/२/१४ सायं ६.१५            
             

मध्यम वर्ग, कॉर्पोरेट्स आणि 'कॉन्सन्ट्रेशन कॅंप'

                      मध्यम वर्ग, कॉर्पोरेट्स आणि  'कॉन्सन्ट्रेशन कॅंप'  
मी जर्मनीला येतोय असं यतीन मराठे, म्हणजे माझा बालमित्र `राजू'ला जेंव्हा कळलं तेंव्हाच त्यानं मला फोन करून दटावलं होतं की "किमान दोन दिवस माझ्या घरी राहायचंच!". मी तत्काळ होकारही दिला. राजू गेली १५ वर्षं जर्मनीत राहतोय, पूर्वी `डुसेलडॉर्फ' जवळ `क्रिफ़ेल्ड'ला राहायचा, आता `म्युनिक'ला. त्याची बायको `क्लौडिया' ही मूळची जर्मनच आहे. संपूर्ण जर्मन आचार-विचार आणि कुटुंब पध्दत स्वीकारून राजू, पत्नी व दोन मुलांसह तिथे स्थायिक आहे. राजूबरोबर लहानपणापासूनच खेळ-मस्ती-उनाडक्या केलेल्या असल्यामुळे तिकडे गेल्यावर त्याच्याशी भरभरून गप्पा होणं स्वाभाविकच होतं. पण क्लौडियादेखील तितक्याच उत्साहानं गप्पांमध्ये सामील झाली. पहिल्या दिवशी दोघं मला म्युनिक दाखवायला घेऊन गेले, तर वाटेत स्थळं-वास्तू दाखवण्याबरोबरच ती त्यासंबंधीचा काहीसा इतिहास आणि तिथल्या चाली-रिती यासंबंधीची माहिती देत होती. दुसऱ्या दिवशी काय पाहायचे त्या यादीत म्युनिकमधील आणखी अनेक प्रसिध्द वास्तू, संग्रहालये, मार्केट आणि भव्य राजवाडा वगैरे गोष्टी होत्या. पण याबाबत चर्चा सुरु असताना अचानक क्लौडियानं विचारलं "'कॉन्सन्ट्रेशन कॅंप' बघणार का? बघून खूप क्लेश होतात, आणि बघायला वेळही खूप लागतो, कदाचित दुसरं काही पाहायला वेळ उरणार नाही. तू इथे हौसेमौजेसाठी आला आहेस…त्यामुळे पाहायचं की नाही विचार करून ठरव." क्षणाचाही विलंब न लावता मी म्हणालो "प्रश्नच नाही. उद्या 'कॉन्सन्ट्रेशन कॅंप'च! बाकी काही बघता नाही आलं तरी चालेल!" तिनं दुसऱ्या दिवशी सकाळी राजू व मला रवाना करत स्वत: येण्याचं नाकारलं.
म्युनिकपासून २५ -३० कि.मी.वर असलेल्या `दाखाउ' या गावात असलेल्या 'कॉन्सन्ट्रेशन कॅंप मेमोरियल साईट' या जागी मी राजूसह पोहोचलो.
 
 
 'कॉन्सन्ट्रेशन कॅंप'च्या स्मारकाचे मुख्य प्रवेशद्वार हे त्याकाळी कैद्यांना आणण्या-नेण्यासाठी वापरले जाणारे एकमेव द्वार होते. बाकी संपूर्ण प्रांगणास उंच भिंतीचा विळखा पडलेला होता. त्यामुळे कैद्याला पळून जाण्यास किंचितही फट मिळत नसे. हिटलरने चान्सलरपद हस्तगत केल्यावर काही आठवड्यातच, दि. २२ मार्च १९३३ रोजी हा 'कॉन्सन्ट्रेशन कॅंप' त्याच्या विरोधकांसाठी बांधण्यात आला. राजकीय विरोधक व ज्यू लोकांचा छळ व सामुदायिक हत्या करण्यासाठी हिटलरला `वेगवान, खात्रीशीर व किफायतशीर योजना' राबवण्याची निकड होती. अशी योजना `दाखाउ' येथे सर्वप्रथम यशस्वीरित्या राबवण्यात आली व नंतर असे सर्व `कॅंप' बांधण्यासाठी `दाखाउ कॅंप' हा `मॉडेल' धरला गेला. या `छळ-छावणी' चे एकूण १७ भाग आहेत. त्यापैकी ` मेन्टेनन्स' विभागाच्या इमारतीत प्रदर्शन मांडले आहे. या प्रदर्शनात मोठमोठ्या पँनल्सवर १९१८साला पासून, `हिटलर'च्या उदयापासून १९४५ साली छळ-छावणीतील कैद्यांच्या मुक्ततेपर्यंतच्या राजकीय घडामोडींचे छायाचित्रांसह वर्णन, चित्रफिती, तसंच, छळ-छावणीत वापरल्या जाणाऱ्या वस्तू, आयुधे, रजिस्टर्स, शिक्के वगैरे बाबी मांडून ठेवल्या आहेत. प्रदर्शनातील प्रत्येक खोलीत शिरताना तेथील `नाझी' शिपायांची मानवी उंची इतकी मोठी छायाचित्रे उभी केली आहेत. त्यामुळे खोलीत शिरताना अनेकदा समोर नाझी सैनिकच उभा असल्याचा भास होतो व दचकायला होतं.
 
प्रदर्शनातील पँनल्सवर सुरुवातीला, १९१८ साली सेप्टेंबरमध्ये पहिल्या महायुध्दात जर्मनीचा पाडाव होऊन जर्मनीचा राजा कैसर हा हॉलंडला पळून गेला यासंबंधीची छायाचित्रे व माहिती लावलेली होती. त्यातच पुढे अशी माहिती होती की, दोस्त राष्ट्रांनी जर्मनीपुढे ठेवलेल्या `शरणागतीच्या करारावर' सह्या करण्यासाठी जर्मनीच्या वतीने कोणी राष्ट्रप्रमुखच न राहिल्यामुळे नाइलाजास्तव [त्यावेळी त्रिशंकू अवस्थेत असलेल्या] जर्मन संसदेत त्यातल्या त्यात सर्वात जास्त सदस्य संख्या असलेल्या `सोशल डेमोक्राट्स' या पक्षाला सह्या करणे भाग पडले. या काळात जर्मनीत तीन-चार प्रमुख पक्ष होते. १] सोशल डेमोक्राट्स- समता व बंधुत्व हा त्यांचा नारा होता २] ख्रिश्चन सोशलिस्ट- यांचा `ज्यू'ना प्रखर विरोध असला तरी नेते मात्र खाजगीत `ज्यूं'शी मैत्रीचे संबंध ठेवत. त्यांच्या नेत्याचे वक्तृत्व अत्यंत प्रभावी होते. नेत्यांच्या व त्यांच्या भाषणांच्या लोकप्रियतेच्या बळावर हा पक्ष अवलंबून होता. ३] पँन जर्मन नाशनालिस्ट - जर्मन वंश [प्रामुख्याने प्रोटेस्टंट] व जर्मन भूभागाचे एकीकरण आणि डाव्यांचा विरोध असे यांचे प्रमुख उद्दिष्ट होते [यांच्यातही बहुतांश जणांना `ज्यूं'बद्दल द्वेष वाटे]. ४] कम्युनिस्ट- जर्मनीचा पराभव त्यांना साम्राज्यवाद-भांडवलदारीचा पराभव वाटत होता व कामगार-क्रांती साठी चालून आलेली सुवर्णसंधी वाटत होती. याखेरीज अन्य पक्ष होतेच, परंतु ते प्रमुख चार पक्षांना आलटून पालटून पाठींबा देत भुरट्या राजकारणातच गर्क होते. त्याकाळातील या राजकीय माहिती सोबत पँनल्सवर त्या नेत्यांची, बैठकांची व शरणागती सह्या करतानाची छायाचित्रे लावलेली होती. कैसर पळून गेल्यामुळे सर्वात मोठा पक्ष असलेल्या सोशल डेमोक्राट्सना आपोआप सत्ता मिळाली. परंतु त्याबरोबरच शरणागतीवर सह्या क्रमप्राप्त ठरल्या. पुढील काळात जर्मनीवर युध्द व पराभव या दोन्हींचे प्रचंड परिणाम घडू लागले. पायाभूत सुविधा बऱ्याच अंशी उध्वस्त झाल्या होत्या, चलन फुगवटा प्रचंड होऊन महागाईने टोक गाठले होते. विरोधक तर होतेच, पण सत्तेत सहभागी असलेले पक्ष देखील सोशल डेमोक्राट्सना धमकावून अडचणीत आणत, स्वत:च्या मर्जीतल्या लोकांना सरकारी कंत्राटे मिळवून देत असत. त्यामुळे सर्वत्र भ्रष्टाचार बोकाळला होता. सर्व विरोधक व विशेषत: कम्युनिस्ट जनतेत सतत असंतोष माजवत होते व संप करून सत्ता उलथवण्यास चिथावणी देत होते. शरणागती करारावर सोशल डेमोक्राट्सनी नोव्हेंबर [१९१८] मध्ये सह्या केल्या होत्या म्हणून त्यांना `नोव्हेंबरचे हरामखोर' म्हणून हिणवले जाऊ लागले. प्रदर्शनातील पँनल्सवरची त्याकाळातील निवडणुकांतील पोस्टर्स, जाहिराती, मोर्चाची छायाचित्रे पाहून पूर्वी मी वाचलेल्या जर्मनीच्या इतिहासाचा पडताळा होत होता आणि का कुणास ठाऊक, भारताच्या सद्य:स्थितीशी मनोमन तुलनाही होत होती.
 
याच काळात हिटलरने राजकारणात पदार्पण करून सोशल डेमोक्राट्स बरोबरच `ज्यूं'वर पराभवाचे खापर फोडायला सुरुवात केली. [त्याकाळी बहुतांश बँका-पतपेढ्या सकट सावकारी धंदा `ज्यूं'च्या हाती होता. बरेचसे अवैध धंदेही `ज्यू' लोकांच्या हाती होते. तसेच काही `ज्यूं'वर फितुरी केल्याचा व जर्मनीची काही गोपनीय कागदपत्रे शत्रूस विकल्याचा आरोप केला जात होता. ] त्याकाळी युरोपियन्सना, विशेषत: जर्मन्सना `ज्यू' लोकांबद्दल कमालीचा तिरस्कार होता. त्यामुळे हिटलरने `ज्यूं'च्या विरुध्द भाषणे देण्यास सुरुवात केल्याबरोबर त्याला लोकांचा प्रतिसाद मिळू लागला. लोकांच्या प्रतिसादाचा कानोसा घेऊन त्याने एप्रिल १९२०मध्ये आपल्या पक्षाचे नाव बदलून `नाझी' [नाशनल सोशलिस्ट जर्मन वर्कर्स पार्टी] असे नाव दिले व पक्षाचे धोरण व उद्दिष्ट जाहीर केले. : १] सर्व जर्मन भूमी एकत्र करून `विशाल जर्मनी' स्थापन करणे २] `ज्यूं'चे नागरिकत्व काढून घेऊन सरकारी पदांवरून काढून टाकणे. त्यानंतर त्याने शालेय व कॉलेज विद्यार्थ्यांसाठी `व्यायाम, खेळ व [जर्मन] संस्कृतीचे' प्रशिक्षण देण्यासाठी `एस. ए.' नामक एक संघटना सुरु करून जागोजाग त्या संघटनेच्या शाखा स्थापन केल्या. यानंतर लागलीच पक्षाची `एस.एस.' नामक एक `सैनिकी संघटना'ही सुरु केली. जर्मन वंशाचा, संस्कृतीचा व देशाचा जाज्वल्य अभिमान तरुणांमध्ये रुजवण्याचे कार्य या नावाखाली प्रत्यक्षात मात्र `ज्यू' धर्मियांचा द्वेष पसरवण्याचे विषारी काम `एसएस' व `एसए' या संघटना करीत असत. हे सर्व सांभाळण्यासाठी काय करावे हे सोशल डेमोक्राट्सना कळत देखील नव्हते. आणि कळले, तर उपाययोजना करण्याची धमकच त्यांच्या नेत्यांत नव्हती. अन्य पक्षियांचा पाठींबा मिळवत कशीबशी सत्ता टिकवण्याची केविलवाणी धडपड करण्यात त्यांचा शक्तिपात होत होता. या वाचलेल्या इतिहासापैकी बरेच उल्लेख या प्रदर्शनात छायाचित्रांसह सापडत होते. आणि त्यात भारतीय राजकारण अनिवारपणे डोकावत होते.
 
सुरुवातीच्या काळात केवळ २.६टक्के मते मिळवू शकणाऱ्या हिटलर व त्याच्या पक्षाला १९३२ साली, म्हणजे पुढील केवळ ११-१२ वर्षांत ३७ टक्के मते मिळाली. एवढी दीर्घ व वेगवान झेप नाझी घेऊ शकण्याचे कारण एसएस व एसए या संघटनांनी चोख बजावलेले `ज्यू' द्वेष पसरवण्याचे कार्य हे जितके होते, तितकेच शेवटच्या तीन वर्षांत आलेली जागतिक मंदी, त्यामुळे आलेली बेरोजगारी, भडकलेली महागाई, बोकाळलेला भ्रष्टाचार व ही सारी परिस्थिती हाताळण्यात सोशल डेमोक्राट्सना येणारे सपशेल अपयश, त्यांच्या नेतृत्वात असलेला दुबळेपणा हे देखील होते! सर्व प्रश्नांवर सोशल डेमोक्राट्सकडे फक्त "शांतता, समता व बंधुभाव!" यापलीकडे उत्तर नव्हते. याउलट हिटलर बेरोजगारी, महागाई व भ्रष्टाचार या साऱ्याचे अगदी सोप्पे कारण देत होता, ते म्हणजे `ज्यूं'चा देशद्रोह व सोशल डेमोक्राट्सनी चालवलेले `ज्यूं'चे तुष्टीकरण!! जणू देशभक्ती म्हणजेच `ज्यू' द्वेष!! हे जनतेला झटकन आकर्षून घेणारे तत्वज्ञान होते. `ज्यूं'चा द्वेष हा ते आपल्या देशभक्तीचा पुरावा मानू लागले. हिटलर त्याच्या सभांमध्ये गर्जत असे, " सोशल डेमोक्राट्स हा पक्ष म्हणजे समता व बंधूभावाचा बुरखा पांघरलेली रोगट वेश्या आहे!!" आणि जनता टाळ्यांचा कडकडाट करत असे. हिटलरच्या सभांना होणारी गर्दी पाहून कॉर्पोरेट्स मागे राहणे शक्यच नव्हते. हिटलरच्या बाहूंना [आर्थिक] बळ देण्यासाठी `हायडेलबर्ग' च्या कारखानदारांपासून बीएमडब्ल्यू, फोक्स-वेगन पर्यंत सारे विख्यात उद्योगपती हिटलरचे गोडवे गात नाझींच्या तंबूत दाखल झाले. हे बळ वापरून हिटलर कम्युनिस्टांसह अन्य पक्षांची मदत घेऊन [नाझी विरोधी] सोशल डेमोक्राट्सप्रणीत आघाडी सरकार विरुध्द सेप्टेम्बर १९३२मध्ये अविश्वासाचा ठराव आणून तो संमत करून घेऊ शकला. याच उद्योगांच्या `आर्थिक बळावर' पुढच्या मुदतपूर्व निवडणुकीत नोव्हेंबर १९३२ मध्ये नाझी पक्षाला ५४५ पैकी १९६ जागा मिळूनही तो चान्सलरपद हस्तगत करू शकला आणि पुन्हा मुदतपूर्व निवडणूक घेऊन मार्च १९३३ मध्ये २८८ [बहुमत] जागा मिळवू शकला. एकंदरीत `भिन्नधर्मियांच्या द्वेषावर आधारित `राष्ट्रवाद' आणि उद्योगपतींचे आर्थिक बळ यांच्या मैथुनातून २१ मार्च १९३३ रोजी हिटलरचे `थर्ड राइश' जन्माला आले!!
 
आणि २२ मार्च १९३३ रोजी `दाखाउ' छळ छावणी प्रस्थापित झाली. इतिहास वाचताना तारखा अशा कधी भयानकरीतीने समोर आल्या नव्हत्या. प्रदर्शनानंतर छळ-छावणीतील बराचसा भाग जतन करून ठेवला आहे तो पाहिला. कैद्यांचे [प्रामुख्याने `ज्यू'] हजेरी घेण्याचे मैदान, त्यांचा कोंडवाडा, शौचालय व सर्वात शेवटी शॉवर [स्नानगृह] म्हणजेच छुपे गैस चेंबर व त्याच्या बाजूला दहनगृह. एका कोंडवाड्यात ६००, असे एकूण ४० कोंडवाड्यात मिळून २४,००० कैदी डांबण्याची तेथे `व्यवस्था' होती. या सर्व कैद्यांपैकी बहुतांश कैदी `ज्यू' असल्यामुळे "ते देशद्रोही असणारच, मग त्यांची चौकशी, न्यायनिवाडा करण्याची गरजच काय??" म्हणून एसएस व एएसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना ट्रकमधून आणल्यावर आरोप-गुन्हे वगैरे कसलीही शहानिशा न करता ते `ज्यू' आहेत हाच गुन्हा असल्याचे गृहीत धरून कैद्यांची वर्गवारी केली जाई. १] `उपयुक्त' [तरुण, जे अंगमेहनतीचे काम करू शकतील असे] २] मध्यम उपयुक्त [मध्यमवयीन. जे मेहनत करू शकत नसत. त्यामुळे विविध रोगांचे व औषधांचे परिणाम तपासण्याच्या प्रयोगांसाठी वापरले जात, असे] ३] अनावश्यक [ज्यांचा कुठलाच उपयोग नाही असे म्हातारे]. `उपयुक्त' वर्गातील `ज्यू' स्त्रियांचा `उपयोग' साहजिकच तेथील एसएस व एएस संघटनांचे पदाधिकारी `सांस्कृतिक कार्यासाठी' करीत असत. तर `मध्यम उपयुक्त' स्त्रिया `राष्ट्रभक्त' ज्येष्ठ जर्मन अधिकाऱ्यांच्या `घरगुती कामासाठी' वापरल्या जात. स्मारकाच्या शेवटच्या भागात गैस चेंबर व दहनगृह आहे. गैस चेंबरमध्ये एका वेळी ५० `अनावश्यक वर्गीयांना' [`ज्यूं'ना] ठार मारण्याची व दहनगृहात ६ मेलेल्या `अनावश्यकांना' जाळण्याची `सोय' केलेली होती. त्यामुळे गैस चेंबरबाहेर दहनासाठी प्रेतांचे `वेटिंग' असे. गैस चेंबरच्या बाहेर चेंबरमध्ये नेण्यात येणाऱ्या व त्यानंतर दहनासाठी रचण्यात आलेल्या प्रेतांच्या ढिगाची छायाचित्रे लावली आहेत. पुढचे छायाचित्र २९ एप्रिल १९४५ रोजी अमेरिकन सैन्याने येथील कैद्यांना मुक्त केले त्याचे होते. तोपर्यंत संस्कृतीचे अभिमानी व राष्ट्रभक्त एसएस व एएसच्या सदस्यांनी अदमासे ४१,५०० कैद्यांना चेंबरद्वारे या `इहलोकातूनच मुक्त' केले होते. काहीकाळ मी सुन्न होऊन तिथेच उभा राहिलो.
 
परत आल्यावर देखील काहीच बोलावेसे वाटत नव्हते. काही वेळानंतर `क्लौडीया'ला विचारले, "तुझ्या आई-वडिलांना कधी विचारले होतेस का, की त्या काळात हिटलरला इतकी मतं कशी मिळालीत? हिटलरबद्दल त्यांचे त्याकाळी काय मत होते?" क्लौडिया काही क्षण गप्प बसली. मग म्हणाली, "माझी आई सांगायची, `सगळा मध्यमवर्ग `जर्मन राष्ट्रवाद' आणि `ज्यू'द्वेषानं पेटला होता. त्यात `दुबळ्या लोकशाही'चा त्यांना तिटकाराही आला होता, त्यांना हिटलर `पोलादी पुरुष' वाटत होता. काही जाणते लोक सांगत की, हिटलर हुकुमशहा बनेल, तो पुन्हा देशाला युध्दाकडे नेईल, विरोधकांची कत्तल घडवेल! पण सामान्य लोकांचा त्यावर विश्वासच बसत नसे. हत्याकांड, युध्द वगैरे होणं इतकं सोपं आहे का? असा ते प्रतिप्रश्न करत. काहीजण तर काही `ज्यू' मेले तर मरू देत, हिटलर हुकुमशहा झाला तर होऊ देत! पण तो देश तरी सुधारेल! असे म्हणत."या माहितीमुळे मला आश्चर्य वाटलं आणि ती सध्याच्या भारतातील मध्यमवर्गाबद्दल बोलतेय की काय असंही वाटायला लागलं. पुन्हा विचारलं, " आईचं स्वत:चं मत काय होतं?" ती म्हणाली, "आईच नव्हे, संपूर्ण मध्यमवर्ग तेंव्हा महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचारानं गांजून गेला होता त्यामुळे `दुबळ्या शांतता-समतावादी सरकार विरोधी झाला होता. माझे आजोबा बेरोजगार झाले होते, त्यांना नाझींमुळे नोकरी मिळाली, त्यामुळे त्यांना हिटलर देशाला तारेल असे मनापासून वाटत होते, असे आई सांगत असे. पहिल्या काही दिवसात हिटलरनं भ्रष्टाचारी `ज्यूं'ना पकडलं होतं, महायुध्दात उध्वस्त झालेले पूल, रस्ते, इमारती वगैरे दुरुस्तीची कामे, नवीन प्रकल्प उभारणीची कामं खूप वेगानं केली होती. त्यामुळे मध्यमवर्गाला हिटलर हा पोलादी पुरुष, `डायनामिक' आणि देशाचा तारणहार वाटत होता" क्लौडिया सांगत होती, आणि मी भारतातील साम्यस्थळ जाणवून धास्तावत होतो. "माझे वडील तर प्रभावित होऊन जर्मन सैन्यात दाखल झाले होते. त्यांना युध्दकैदी म्हणून पकडून इंग्लंडला नेलं होतं. नंतर सोडलं त्यांना, ते अत्याचारात सामील नव्हते म्हणून " - ती पुढं म्हणाली. मी स्तिमित होऊन विचारलं, "मग नंतरच्या काळात त्यांना काय वाटायचं ते तू विचारलंस का त्यांना?" "हो. खूप वेळा. पण त्यांनी कधीच त्याचं उत्तर दिलं नाही. नुसतं शून्यात बघायचे. मी मोठी झाल्यावर प्रश्न नव्हे जाब विचारू लागले वडलांना… पण नंतर ते आणखी आणखी गप्प होत गेले. पुढे पुढे तर ते काहीच न बोलता घुम्यासारखे बसून असायचे. आता मला खूप वाईट वाटतं, मी त्यांना टोचणारे प्रश्न विचारून क्लेश दिले म्हणून. ते एकटेच नव्हे सगळा मध्यमवर्गच भुलला होता की `एकव्यक्तीकेन्द्री' नाझीवादाला, त्या सर्वांनाच मनापासून वाटत होतं की, `नोव्हेंबरच्या हरामखोरांना आणि ज्यूंना हाकलून दिल्याखेरीज देश सुधारणार नाही असे!' वेर्नर हायडर हे एक होते अशा असंख्य लोकांपैकी! सगळ्यांनी मिळून हिटलरला निवडून दिलंय एकट्या वेर्नर हायडरने नव्हे!"- ती म्हणाली. "वेर्नर हायडर म्हणजे कोण?"मी विचारलं. " माझे वडील. मी माझ्या वडलांना जाब विचारून क्लेश दिल्याबद्दल जितकं दु:ख होतं, तितकंच वडलांनी हिटलरला मत देऊन नंतर त्याच्याबाजूनं युध्द केल्याबद्दलही !!! डोकं भणाणून जातं याबाबतीत विचार करून!"- ती म्हणाली. " तुझ्या आणि तुझ्या पुढच्या, म्हणजे हल्लीच्या पिढीला काय वाटत नाझी कालखंडाबाबत?"- मी विचारलं. ती अधिकच खिन्नपणे म्हणाली, "आमची पिढी तर जर्मन असण्याची केवळ लाज बाळगत जगली. जगभरात कुठेही `जर्मन' म्हणून ओळख देताना मान खाली जायची. आमची पिढीनं दुभंगलेला देश अनुभवला. आत्ताच्या पिढीला कदाचित तितके अपमानित वाटत नसेल. कारण आता पुन्हा जर्मनी एक झाला, आता नाझींच्या आठवणी सांगू शकणारे त्या पिढीतले कोणी राहिलेले नाहीत फारसे. पण तरी या `दाखाउ' 'कॉन्सन्ट्रेशन कॅंप मेमोरियल सारख्या वास्तू आहेत ना बऱ्याच ठिकाणी, त्यामुळे आपल्या पूर्वजांचं पाप विसरणं अशक्य आहे नवीन पिढीला देखील. क्वचित एखादा निओ नाझी निपजतो आणि काही कारवाया करूही पाहतो. परंतु असे लोक अर्धा टक्का देखील नाहीत. आणि दुसरं, जर्मनीत हिटलर, नाझी याचं दुरान्वये देखील समर्थन करणे, किंवा `ज्यूं'बद्दल अप्रत्यक्षदेखील अपशब्द बोलणं हा कायद्यानं मोठा गुन्हा आहे. त्यामुळे धार्मिक द्वेष आणि आक्रमक राष्ट्रभक्ती या दोनही जीवघेण्या रोगांना जालीम प्रतिबंधक लस संपूर्ण नव्या पिढीला टोचली गेली आहे." क्लौडियाचं ऐकताना `दाखाउ'ला येण्याचं तिनं का नाकारलं त्याचा उलगडा मला झाला.
 
जर्मनीत १५ वर्षे राहिलेला राजू एव्हाना भारताबद्दल ऐकण्यास अधीर झाला होता. संधी मिळताच राजूनं विचारलं, "भारतात कसं आहे रे सध्या? मी गप्प बसलो. त्यानं पुन्हा विचारलं "तिथंही डायनामिक नेत्यांच्या मागे मोठेमोठे उद्योगपती पैशाच्या थैल्या घेऊन उभे राहिलेत म्हणे?". हा प्रश्न ऐकून वेर्नर हायडरप्रमाणे मलादेखील शून्यात पाहात राहण्याखेरीज पर्याय दिसेना…
 
 
लोकेश शेवडे ४/११/१३ दुपारी १.४०