Thursday, December 10, 2020

फॅसिझमचा `अर्थ'

फॅसिझमचा `अर्थ' ९ नोव्हेंबर १९२१ रोजी बेनिटो मुसोलिनी या इटालियन नेत्याने "पार्टीटो नाझिओनेल फॅसिस्टा" (नॅशनॅलिस्ट फॅसिस्ट पार्टी) या नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला, या घटनेच्या शताब्दी वर्षात आता आपण वावरतो आहोत. ९९ वर्षांपूर्वीच्या या घटनेनंतर मुसोलिनीने जागोजाग स्लाव्ह व गौरेतरांविरुद्ध स्फोटक भाषणं देऊन, विखारी पत्रकं वाटून त्यांच्या विरुद्ध इटालियन्सना भडकवायला सुरुवात केली आणि वर्षभरातच या पक्षाची एक निमलष्करी शाखा `ब्लॅकशर्ट्स' या नावाने सुरु करून फॅसिस्ट पक्ष व ब्लॅकशर्ट्स मार्फत सरकारविरोधी आंदोलने उभारून देशभर असंतोष माजवला. असंतोष शिगेला पोहोचल्यावर या ब्लॅकशर्ट्सच्या हजारो स्वयंसेवकांसह मुसोलिनी इटलीच्या राजधानीवर (मार्च ऑन रोम) चालून गेला आणि २९ ऑक्टोबर १९२२ रोजी या ब्लॅकशर्ट्सच्या स्वयंसेवकांच्या दबावाला बळी पडून इटलीच्या राज्यकर्त्यानं मुसोलिनीच्या हाती सत्ता सुपूर्द केली. सत्ता हाती घेण्यापूर्वी मुसोलिनीने निवडणुका घेण्याचं आश्वासन दिलं होतं, त्यानुसार त्यानं दोन वर्षांत, एप्रिल १९२४ मध्ये निवडणुका घेतल्या. या निवडणुकांत फॅसिस्ट पार्टी प्रचंड बहुमतानं विजयी होऊन पुन्हा मुसोलिनीच सत्ताधीश झाला. या निवडणुकीत मतपत्रिका व मतमोजणीत मुसोलिनीने `ब्लॅकशर्ट्स'मार्फत  प्रचंड मोठा घोटाळा केला अशी तक्रार सर्वच विरोधकांनी केली. त्यातला प्रमुख तक्रारदार सोशालिस्ट पार्टीचा नेता जोकोमो मित्तीओती (Giacomo Matteotti) यानं सदर घोटाळ्यामुळे ही निवडणूक रद्द ठरवावी अशी मागणी केली व त्याला लोकांचा पाठींबा मिळू लागला. मित्तीओतीच्या मागणीला पाठिंबा मिळू लागल्यानंतर काही दिवसातच त्याची हत्या झाली. तपासात त्याचा खून मुसोलिनीचा विश्वासू गारदी `अमेरिगो डुमिनी' यानं ब्लॅकशर्ट्सच्या सहाय्यानं केल्याचं सिद्ध झालं. तथापि त्याला केवळ दोन वर्षांचा तुरुंगवास देऊन नंतर `दये'खातर सोडून देण्यात आलं. (अर्थातच आता न्यायाधीशही राष्ट्रभक्त-फॅसिस्ट पार्टीचे `सहानुभूतीदार' होते) या दोन वर्षांत `ब्लॅक शर्ट्स' या संघटनेनं निवडणूक घोटाळ्याविरुद्ध चाललेलं आंदोलन चिरडून टाकलं. त्यानंतर मात्र मुसोलिनीने कायदेशीर-संविधानात्मक बदलांद्वारे विरोधकांची संपूर्ण कोंडी करून मरेपर्यंत खुल्या निवडणुका होऊ दिल्या नाहीत आणि सर्वंकष एकमेव सत्ताधारी राहिला. सर्वंकष सत्ता हस्तगत करून सत्ता कायमस्वरूपी आपल्या एकट्याकडे ठेवण्याचं हे मुसोलिनीचं तंत्र जगभरातल्या त्या काळातल्या अनेक नेत्यांना भुरळ पाडत होतं. आपणही आपल्या देशात मुसोलिनीचं तंत्र राबवावं असं त्यांना वाटत होतं. त्यात काही भारतीय नेतेही होते आणि हिटलरदेखील होता. हिटलरनं मुसोलिनी-`नॅशनल फॅसिस्ट पार्टी' यांचं कौशल्य-तंत्र आत्मसात तर केलंच, पण पुढील दहा वर्षांत अधिकाधिक `विकसित' करून जर्मनीत अधिक `यशस्वीरित्या', अधिक `परिणामकारकरित्या' राबवलं. मुसोलिनीच्या कारकिर्दीच्या अखेरीस त्याला जनतेच्या तीव्र रोषास-असंतोषास सामोरं जाऊन बळी पडावं लागलं. मात्र संपूर्ण जर्मनी उध्वस्त झाला तरी हिटलरनं आत्महत्या करेपर्यंत जनतेनं त्याच्याविरुद्ध एकही उठाव केला नाही. म्हणून हिटलरचा फॅसिझम (याला `नाझी'झमदेखील म्हणतात) हा मुसोलिनीपेक्षा अधिक यशस्वी ठरतो. वस्तुतः "फॅसो" (fascio) या मूळ इटालियन शब्दाचा अर्थ मोळी, पेंढी किंवा `संघ'. फॅसी (fasci) हे `फॅसो'चे बहुवचन. जगभरातल्या सर्व भाषा परस्परांच्यातले शब्द स्वीकारत असतात, बरेचदा परक्या भाषेतला शब्द आत्मसात करताना त्यांचे मूळ उच्चार आणि अर्थही बदलतात. पण एखाद्या शब्दाचा मूळ भाषेतच अर्थ बदलला आणि तो शब्द जगभरातल्या सर्व भाषांमध्ये नवीन अर्थासह स्वीकारला गेला असं उदाहरण विरळच. अशा विरळ शब्दांमध्ये `फॅसी' या शब्दाची गणना होईल. मुसोलिनीच्या हाती इटलीची सत्ता आल्यानंतर इटलीसकट जगभर या शब्दाचा वापर विशिष्ट प्रकारच्या `राजकारणा'साठी होऊ लागला. हा वापर इतका सर्रास झाला की त्यावरून पुढे `फॅसीझम' असा एक शब्द आणि अर्थात `इझम' देखील अस्तित्वात आला, त्या शब्दाची जगन्मान्य व्याख्या देखील तयार झाली. "फॅसिझम म्हणजे आक्रमक राष्ट्रवाद, बहुसंख्याकवाद, बहुसंख्याकांचे सांस्कृतिक श्रेष्ठत्व, पुराणमतवाद यांच्या आधारे बहुसंख्याकांमध्ये लोकप्रियता मिळवून सत्ता मिळवून मग बहुसंख्याकांना उदारमतवाद, लोकशाही यांविरुद्ध चिथावून, कॉर्पोरेट्सच्या संगनमतानं विरोधकांना नेस्तनाबूत करत एकाधिकारशाही स्थापन करणे". अशा प्रकारच्या राजकारणाला गेली ९९ वर्षे जगभरातल्या सर्व भाषांमध्ये `फॅसीझम" हाच शब्द वापरला जातो. हीच फॅसिझमची अधिकृत व्याख्या मानली जाते. एका अर्थी फॅसिझम म्हणजे हुकूमशाही किंवा एकाधिकारशाही किंवा लष्करशाही असते. कारण फॅसिझम मध्ये लष्करापासून, सांस्कृतिक-शैक्षणिक-क्रीडा आणि परराष्ट्र धोरणापर्यंत सर्वाधिकार एकाच व्यक्तीच्या हाती असतात. म्हणून ते शब्द फॅसिझमसाठी वेगवेगळ्या भाषांत वापरले जातात. पण केवळ एकाधिकारशाही किंवा हुकूमशाही किंवा लष्करशाही या एकेका शब्दांत किंवा अधिकृत व्याख्येत `फॅसिझम'चा अर्थ किंवा वर्णन सामावणं आणि फॅसिझमचं वास्तवातलं स्वरूप आकलन होणं शक्य नाही. फॅसिझमचा वास्तवाशी भिडणारा खरा अर्थ समजण्यासाठी व्याख्येपेक्षा `हिटलर' जाणून घेणं आवश्यक आहे.  हिटलरचा उदय हा पहिल्या महायुद्धातल्या जर्मनीच्या पराभवानंतरचा आहे. या काळात जर्मनीत तीन-चार प्रमुख पक्ष होते. १] सोशल डेमोक्रॅट्स - समता व बंधुत्व हा त्यांचा नारा होता  २] ख्रिश्चन सोशलिस्ट - यांचा `ज्यूं'ना प्रखर विरोध असला तरी नेते मात्र खाजगीत `ज्यूं'शी मैत्रीचे संबंध ठेवत. त्यांच्या नेत्याचं वक्तृत्व अत्यंत प्रभावी होतं. नेत्यांच्या व त्यांच्या भाषणांच्या लोकप्रियतेच्या बळावर हा पक्ष अवलंबून होता. ३] पँन जर्मन नॅशनॅलिस्ट - जर्मन वंश [प्रामुख्याने प्रोटेस्टंट] व जर्मन भूभागाचे एकीकरण आणि डाव्यांचा विरोध अशी यांची प्रमुख उद्दिष्टं होती [यांच्यातही बहुतांश जणांना `ज्यूं'बद्दल द्वेष वाटे]. ४] कम्युनिस्ट- जर्मनीचा पराभव त्यांना साम्राज्यवाद-भांडवलदारीचा पराभव वाटत होता व जगातील कामगारांचे एकीकरण करून `वर्ग कलह' निर्माण करण्यासाठी, कामगार-क्रांतीसाठी चालून आलेली दुसरी सुवर्णसंधी वाटत होती.[पहिली क्रांती बरोबर १ वर्षापूर्वी १९१७ साली रशियात झाली होती.] याखेरीज अन्य पक्ष होतेच, परंतु ते प्रमुख चार पक्षांना आलटून पालटून पाठिंबा देत भुरट्या राजकारणातच गर्क होते. जर्मनीचा राजा कैसर  पळून गेल्यामुळे सर्वात मोठा पक्ष असलेल्या सोशल डेमोक्रॅट्सना आपोआप सत्ता मिळाली. वास्तविक सत्ता व शरणागती या दोन्ही बाबी सोशल डेमोक्रॅट्सना परिस्थितीमुळे क्रमप्राप्त होत्या. परंतु बाकीच्या सर्व  पक्षांनी शरणागतीचं खापर सोशल डेमोक्रॅट्सच्या माथी मारायला सुरुवात केली. तरीही त्यानंतरच्या पहिल्या संसदीय निवडणुकीत सोशल डेमोक्रॅट्सना १८५ जागा मिळाल्या. विविध प्रजासत्ताकवादी पक्षांना मिळून १६६ जागा, तर प्रजासत्ताकवरोधी [म्हणजे राजेशाही/हुकुमशाही वादी] पक्षांना ६३ जागा मिळाल्या. परिणामत: सोशल डेमोक्रॅट्स इतर पक्षांच्या सहकार्याने कसाबसा सत्तेवर आला. यापुढील काळात जर्मनीवर युद्ध व पराभव या दोन्हींचे प्रचंड परिणाम घडू लागले. पायाभूत सुविधा बऱ्याच अंशी उध्वस्त झाल्या होत्या, चलन फुगवटा प्रचंड होऊन महागाईने टोक गाठलं होतं. विरोधक तर होतेच, पण सत्तेत सहभागी असलेले पक्ष व स्वपक्षीय देखील सोशल डेमोक्रॅट्सना धमकावून अडचणीत आणत. स्वत:च्या मर्जीतल्या लोकांना सरकारी कंत्राटे मिळवून देत असत. त्यामुळे सर्वत्र भ्रष्टाचार बोकाळला होता. सर्व विरोधक व कम्युनिस्ट जनतेत  सतत असंतोष माजवत होते. कम्युनिस्ट तर अव्याहतपणे सरकारी कर्मचाऱ्यांना संपासाठी हाक देऊन सत्ता उलथवण्यास चिथावणी देत होते. शरणागती करारावर सोशल डेमोक्रॅट्सना (नोव्हेंबर १९१८ मध्ये) सह्या कराव्या लागल्या होत्या, त्याबद्दल सर्व पक्ष त्यांच्यावर दोषारोप करत होते. या काळात हिटलरचा प्रभाव नगण्य असला तरी त्याची लोकप्रियता मूळ धरू लागली होती. याच सुमारास, हिटलरनं सोशल डेमोक्रॅट्स विरुद्ध `नोव्हेंबरचे हरामखोर' ही नवी संज्ञा तयार करून जनतेला चिथवायला सुरुवात केली आणि शरणागतीचं खापर सोशल डेमोक्रॅट्स बरोबरच अल्पसंख्य असलेल्या `ज्यूं'वर फोडायलाही सुरुवात केली. या नव्या संज्ञेमुळे आणि `ज्यूं'विरुद्ध चेतवलेल्या द्वेषामुळे हिटलरच्या लोकप्रियतेनं एकदम मुसंडी मारली. (त्याकाळी बहुतांश बँका-पतपेढ्या सकट सावकारी धंदा `ज्यूं'च्या हाती होता. बरेचसे अवैध धंदेही `ज्यू' लोकांच्या हाती होते. तसंच काही `ज्यूं'वर फितुरी केल्याचा व जर्मनीची काही गोपनीय कागदपत्रे शत्रूस विकल्याचा आरोप केला जात होता.) त्याकाळी युरोपियन्सना, विशेषत: जर्मन्सना `ज्यू' लोकांबद्दल कमालीचा तिरस्कार होता. त्यामुळे हिटलरनं `ज्यूं'च्या विरुध्द भाषणे देण्यास सुरुवात केल्याबरोबर त्याला लोकांचा प्रतिसाद मिळू लागला. लोकांच्या प्रतिसादाचा कानोसा घेऊन त्यानं एप्रिल १९२०मध्ये आपल्या पक्षाचं नाव बदलून `नाझी' [नॅशनल सोशलिस्ट जर्मन वर्कर्स पार्टी] असं नाव दिलं आणि पक्षाचं धोरण व उद्दिष्ट जाहीर केलं. :  १] सर्व जर्मन भूमी एकत्र करून `विशाल जर्मनी' स्थापन  करणे  २] `ज्यूं'चे नागरिकत्व काढून घेऊन सरकारी पदांवरून काढून टाकणे. त्यानंतर त्याने शालेय व कॉलेज विद्यार्थ्यांसाठी `व्यायाम, खेळ व [जर्मन] संस्कृतीचे' प्रशिक्षण देण्यासाठी, राष्ट्रभक्ती रुजवण्यासाठी `एस. ए.' (स्टुर्म ऍब्तेलंग) नामक एक संघटना सुरु करून जागोजाग  शाखा स्थापन केल्या. यानंतर लागलीच पक्षाची `एस.एस.' (शुट्झस्टॅफेल) नामक एक `निमलष्करी संघटना'ही सुरु केली. "जर्मन वंशाचा, संस्कृतीचा व देशाचा जाज्वल्य अभिमान तरुणांमध्ये रुजवण्याचे कार्य" या नावाखाली प्रत्यक्षात मात्र विरोधकांबद्दल व विशेषतः `ज्यू' धर्मियांबाबत अफवा पसरवण्याचं, त्यांच्याबद्दल जनतेत द्वेष भिनवण्याचं विषारी कार्य `एसएस' व `एसए' या संघटना करीत असत. हे सर्व सांभाळण्यासाठी काय करावं हे सोशल डेमोक्रॅट्सना कळत देखील नव्हतं. आणि कळलं, तरी उपाययोजना करण्याची धमकच त्यांच्या नेत्यांत नव्हती. अन्य पक्षियांचा पाठिंबा मिळवत कशीबशी सत्ता टिकवण्याची केविलवाणी धडपड करण्यात त्यांचा शक्तिपात होत होता. सुरुवातीच्या काळात केवळ २.६ टक्के मते मिळवू शकणाऱ्या हिटलर व त्याच्या पक्षाला १९३२ साली, म्हणजे पुढील केवळ १०-१२ वर्षांत ३७ टक्के मते मिळाली. एवढी दीर्घ व वेगवान झेप नाझी घेऊ शकण्याचं कारण एसएस व एसए या संघटनांनी चोख बजावलेलं `ज्यू' द्वेष पसरवण्याचे कार्य हे जितकं होतं, तितकंच शेवटच्या तीन वर्षांत आलेली जागतिक मंदी, त्यामुळे आलेली बेरोजगारी, भडकलेली महागाई, बोकाळलेला भ्रष्टाचार व ही सारी परिस्थिती हाताळण्यात सोशल डेमोक्रॅट्सना येणारं संपूर्ण अपयश! त्यांच्या नेतृत्वात असलेला दुबळेपणा हे देखील होतं! सर्व प्रश्नांवर सोशल डेमोक्रॅट्सकडे फक्त "शांतता, समता व बंधुभाव!" यापलीकडे उत्तर नव्हतं. याउलट हिटलर बेरोजगारी, महागाई व भ्रष्टाचार या साऱ्याचे अगदी सोप्पं कारण देत होता, ते म्हणजे `ज्यूं'चा देशद्रोह व सोशल डेमोक्रॅट्सनी चालवलेले `ज्यूं'चं तुष्टीकरण!! जणू देशभक्ती म्हणजेच `ज्यू' द्वेष!! त्यासाठी तो वेळोवेळी `ज्यूं'बाबतीत विष ओकणारी पत्रकं वाटून अफवा पसरवत असे व या अफवा पसरवण्यात त्यावेळची प्रसारमाध्यमं खोट्या बातम्या देऊन त्याला साथ देत. हे जनतेला झटकन आकर्षून घेणारं राजकारण होतं. `ज्यूं'चा द्वेष हा ते आपल्या देशभक्तीचा पुरावा मानू लागले. हिटलर त्याच्या सभांमध्ये गर्जत असे, "सोशल डेमोक्रॅट्स हा पक्ष म्हणजे समता व बंधुभावाचा बुरखा पांघरलेली रोगट वेश्या आहे!!" आणि जनता टाळ्यांचा कडकडाट करत असे. हिटलरच्या सभांना होणारी गर्दी पाहून कॉर्पोरेट्स मागे राहणं शक्यच नव्हतं. हिटलरच्या बाहूंना आर्थिक बळ देण्यासाठी `हायडेलबर्ग'च्या कारखानदारांपासून बीएमडब्ल्यू, फोक्स-वॅगन पर्यंत सारे विख्यात कॉर्पोरेट्स हिटलरच्या  रोजगार व औद्योगिक धोरणाचे गोडवे गात नाझींच्या तंबूत दाखल झाले. हे बळ वापरून  हिटलर कम्युनिस्टांसह (!!) अन्य  पक्षांची मदत घेऊन [नाझी विरोधी] सोशल डेमोक्रॅट्स प्रणित आघाडी सरकार विरुध्द सेप्टेंबर १९३२मध्ये अविश्वासाचा ठराव आणून तो संमत करून घेऊ शकला. याच उद्योगांच्या `आर्थिक बळावर' पुढच्या मुदतपूर्व निवडणुकीत नोव्हेंबर १९३२ मध्ये नाझी पक्षाला ५८४ पैकी १९६ जागा मिळूनही तो चॅन्सलरपद हस्तगत करू शकला.  १९३२ सालच्या नोव्हेंबरमधल्या निवडणुकीत हिटलरच्या नाझी पक्षाला १९६ जागा मिळून तो संसदेतील सर्वात मोठा पक्ष ठरला होता. सोशल डेमोक्रॅटस, कम्युनिस्टस आणि सी एन पी या पक्षांना अनुक्रमे १२१, १०० व ५२ जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत हिटलरच्या नाझी पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी त्याच्या मतांची टक्केवारी ३२ टक्क्यांपेक्षा कमी होती. म्हणजे ६८ टक्के मतदान हिटलरविरोधी असूनही त्याचा नाझी पक्ष हा सर्वात प्रबळ पक्ष ठरला होता. पुढच्या दोन महिन्यात स्वपक्षीय प्रतिस्पर्ध्यांचा काटा काढून, उद्योगपतींच्या आर्थिक मदतीने अन्य पक्षीयांत तोडफोड करून त्यांच्यातल्या काही गटांचा आणि अध्यक्ष हिंडेनबुर्ग याचा पाठींबा मिळवून हिटलर चॅन्सलरपदी (प्रधानमंत्रीपदी) विराजमान झाला. स्वतः चॅन्सलरपदी आल्याबरोबर त्यानं गृहमंत्रीपदी आणि संसदेच्या अध्यक्षपदी (सभापती) आपला अत्यंत निकटचा साथीदार `गोअरिंग' याची नेमणूक करून लगेच पुन्हा निवडणुका घेण्यासाठी अध्यक्षांमार्फत संसद बरखास्त करून घेतली. अर्थात संसद बरखास्त झाली तरी सत्ता हिटलरच्याच हाती होती. पुढच्या महिनाभरात गृहमंत्री गोअरिंगने पोलिसांमधल्या ८० टक्के जागा एसए-एसएस (नाझी निमलष्करी-सांस्कृतिक संघटना) यांनी भरून टाकल्या. यानंतर कम्युनिस्ट्स आणि एसए-एसएस यांच्यात जागोजाग हाणामाऱ्या घडवून, हिंसाचाराचं कारण पुढे करत कम्युनिस्ट पक्षावर बंदी आणली. निवडणुकांची तारीख घोषित झाली ५ मार्च १९३३!  २० फेब्रुवारीला हिटलरने गोअरिंगच्या अध्यक्षीय निवासस्थानी काही उद्योगपतींची आपल्या मोजक्या सहकाऱ्यांसह बैठक घेऊन त्यांना सांगितलं,"ही निवडणूक शेवटची व्हावी. यानंतर पुन्हा निवडणूक घेण्याची गरज पडायला नको अशी माझी इच्छा आहे. यानंतर एकाच आठवड्यात, २७ फेब्रुवारी रोजी, म्हणजे निवडणुकीला एक आठवडा उरला असताना अचानक राईशटॅगला प्रचंड मोठी आग लागली. राईशटॅगला आग लागल्याची बातमी ऐकून हिटलर, त्याचा सर्वात विश्वासू सहकारी गोबेल्स आणि गोअरिंग तिथे थोड्याच अवधीत तिथे पोहोचले. आग पाहून गोअरिंग म्हणाला, "हे कम्युनिस्टांचेच कृत्य असणार." गोअरिंगचे हे वाक्य संपतानाच पोलिसांनी `लुबी' नावाच्या एका कम्युनिस्ट कार्यकर्त्याला संसद भवनातून पकडून बाहेर आणले. हिटलरने त्वरित ४००० नाझीविरोधी व कम्युनिस्ट कार्यकर्त्यांची धरपकड करून त्यांना तुरुंगात डांबलं   आणि रेडियोवरून भाषणे करून `राईशटॅग फायर'चे खापर नाझीविरोधी राजकारण्यांवर फोडायला सुरुवात केली. गोअरिंग आणि हिटलर यांनी रेडियोवरून गर्जना केली,"संसद भवन जाळणाऱ्या देशद्रोह्यांना धडा शिकवल्याखेरीज आम्ही थांबणार नाही. राष्ट्रशक्ती आणि पोलीसांची शक्ती वापरून या देशद्रोह्यांचा नायनाट केला जाईल." हिटलरच्या अगोदरचा पंतप्रधान ( चॅन्सलर ) हेनरीच ब्रुएनिंग अध्यक्षांपासून जनतेपर्यंत सर्वांना आवाहन करत होता, "अध्यक्षांना विनंती आहे की जुलुमाच्या या थैमानाला आवर घाला. राईशटॅगच्या आगीची सखोल चौकशी करा. संविधानाचे पावित्र्य राखून सनदशीर मार्गाचा अवलंब करण्याचा आमचा निर्धार आहे." पण जनतेला राष्ट्रवादाचा आणि निवडणुकीचा ज्वर इतका चढला होता की या माजी प्रधानमंत्र्याच्या विनंतीला कोणीही भीक घालायला तयार नव्हते. जर्मनीच्या संपूर्ण मध्यमवर्ग आणि उच्चमध्यमवर्गाच्या राष्ट्रवादाला `राईशटॅग फायर' मुळे उधाण आलं होतं. राईशटॅगवरचा हल्ला जनतेला जर्मन सार्वभौमत्वावरचा, लोकशाहीवरचा हल्ला वाटत होता. नाझीविरोध म्हणजेच राष्ट्रद्रोह याची मध्यमवर्गाला खात्रीच पटली होती. ५ मार्चला निवडणूक झाली आणि नाझी पक्षाला २८८ जागा मिळाल्या. १९६ वरून २८८ जागांची झेप नाझी पक्षानं `राईशटॅग फायर'मुळे घेतली. या उत्तुंग झेपेमागे अन्य कारणंही होती पण ती फार उशिरा लोकांना कळली. या साऱ्या निवडणुकीच्या धामधुमीत एकटा लुबी इतक्या प्रचंड मोठ्या इमारतीला आग कशी लावू शकला? हा साधा प्रश्न राष्ट्रवादाने भडकलेल्या जनतेपैकी एकालाही पडला नाही. वास्तविक, `राईशटॅग'च्या इमारतीत जाण्याचा एकच अंतर्मार्ग होता, जो राईशच्या अध्यक्षांच्या निवासाच्या तळघरातून जात होता. राईशचा अध्यक्ष होता दस्तूर खुद्द गोअरिंग!! म्हणजे, `राईशटॅग फायर'साठी लागणारं इंधन, स्फोटकं वगैरे सामग्री गोअरिंगच्याच योजनेनुसार त्याच्याच देखरेखीखाली नाझींनी संसद भवनात पोहोचवली असणार. पण असा तर्क करण्यासाठी जर्मन जनता भानावर होती कुठे? जनता सूड भावनेनं पेटली होती. जनतेनं `राईशटॅग फायरचा' प्रतिशोध घेण्यासाठी हिटलरहाती सत्ता दिली. हिटलर सत्ताधीश झाल्यावर लुबीवर खटला भरला गेला. `राईशटॅग'मध्ये स्फोटकं, इंधन केंव्हा, कसे आणले गेले याचे कोणतेही पुरावे सापडले नाहीत. राष्ट्रीय सुरक्षेचं कारण पुढे करून सगळेच पुरावे नष्ट करण्यात आले होते. या प्रकरणात एकही नाझी सापडला नाही.(अर्थातच आता न्यायाधीशही राष्ट्रभक्त -`नाझी' सहानुभूतीदार होते) धरपकड केलेल्या नाझीविरोधी ४/५००० लोकांचं काय झालं तेही कोणाला नेमकं माहीत नाही. लुबीचा शिरच्छेद केला गेला...... पुढे न्युरेंनबर्ग खटल्याच्या काळात असं कळलं की मार्च १९३३च्या निवडणुकांमध्ये हिटलर-गोबेल्स या जोडगोळीनं  ४/५ टक्के बनावट मतपत्रिकांचा वापर केला होता आणि एसए, एसएस यांनी बरंच खोटं मतदान देखील केलं होतं, या खोट्या मतदानाबाबत काही उमेदवारांनी व पक्षांनी तक्रारीही केल्या होत्या. पण राईशटॅग  फायरने जनतेत पेटवलेल्या राष्ट्रवादामुळे कोणालाही त्या तक्रारींत तथ्य वाटलं नाही. हिटलर-गोबेल्स यांनी मतदानात-मतपत्रिकेत घोटाळा केल्याचं कोणी मध्यम- उच्च वर्गीय ऐकूनच घ्यायला तयार नव्हते. थोडक्यात, `ज्यू'द्वेषाधारित राष्ट्रवाद, अगोदरच्या सत्ताधाऱ्यांचा नाकर्तेपणा आणि अन्य पक्षांची सोशल डेमोक्रॅट्सच्या विरोधात हिटलरला साथ, या तीन बाबींचा एकत्रित परिणाम म्हणजे नाझी पक्षाच्या १९३२ सालच्या  १९६ जागा!! तर, बनावट मतपत्रिका, बनावट मतदान, बनावट हल्ला (राईशटॅग फायर) या तिन्हींचा एकत्रित परिणाम म्हणजे नाझी पक्षाची १९३३ साली १९६ वरून २८८ जागांवर झेप!! अशा या `बनावट' निवडणुकीनंतर हिटलर हयात असेपर्यंत निवडणुका झाल्याच नाहीत........   फक्त युद्धं होत राहिलीत. यानंतर दुसरं महायुद्ध, त्यात घडलेला संहार, ज्यूंच्या छळछावण्या, त्यांचं हत्याकांड, ज्यूंना हुडकून छळछावण्यांमध्ये कोंडण्यासाठी `उपयुक्त' ठरलेले एसए व एसएसचे स्वयंसेवक हा सारा इतिहास सर्वज्ञात आहे. एकंदरीत `अल्पसंख्याकांच्या, भिन्नधर्मियांच्या द्वेषावर आधारित `राष्ट्रवाद', भिन्न धर्मियांविरुद्ध खोट्या बातम्या, विरोधकांविरुद्ध खोटे आरोप, खोटं मतदान आणि कॉर्पोरेट्सचं आर्थिक बळ यांनी जनतेवर केलेल्या सामूहिक बलात्कारातून २१ मार्च १९३३ रोजी हिटलरचं `थर्ड राइश' जन्माला आलं आणि हिटलरनं ३० एप्रिल १९४५ रोजी आत्महत्या करेपर्यंत ते जगलं!! हे थर्ड राईश जिवंत असेपर्यंत जर्मन जनता ज्यूंच्या रक्षणासाठी किंवा हिटलरच्या अत्याचारांचा, युद्धातल्या पराभवाचा जाब विचारायला रस्त्यावर उतरली नाही. कारण या संपूर्ण कालावधीत, रेडियोच्या विविध वाहिन्यांवरचे सर्व निवेदक अव्याहतपणे `ज्यूं'विरुद्ध जहरी गरळ ओकत होते आणि जर्मनी विजयी होत असल्याच्या खोट्या बातम्या कंठशोष करत देत होते. वर्तमानपत्रांतून जर्मनी जिंकल्याच्या  आणि `ज्यूं'च्या फितुरीच्या बातम्या, खोटी छायाचित्रं पानापानावर प्रसिद्ध होत. तशातही एखाद्यानं जाब विचारलाच, तर त्याला देशद्रोही ठरवून त्याची रवानगी यमसदनी अथवा तुरुंगात केली जाई आणि मध्यम-उच्च वर्गीयांना त्या जाब विचारणाऱ्याला ठोठावलेली शिक्षा `योग्य' वाटे. परिणामतः जनतेतील ज्यूद्वेषावर आधारित राष्ट्रवाद धगधगत ठेवण्यात, युद्धात जर्मनीचा सपशेल पराभव होतो आहे हे सत्य जनतेपासून लपवून ठेवण्यात हिटलर-गोबेल्स ही दुक्कल कमालीची यशस्वी झाली होती. एव्हाना जगातले कोट्यवधी लोक हे हिटलर-मुसोलिनी प्रणित दुसऱ्या महायुद्धात आणि लक्षावधी ज्यू हिटलरच्या छळछावण्यांत मृत्यमुखी पडले होते.........  फॅसिझमचा जनक `मुसोलिनी, अथवा `फॅसिझम'चा `यशस्वी' वापर करणाऱ्या हिटलर यांची कारकिर्द पाहता, केवळ एकाधिकारशाही किंवा हुकूमशाही किंवा लष्करशाही या एकेका शब्दांमध्ये `फॅसिझम'चा  अर्थ किंवा वर्णन सामावणं शक्य नाही. एकाधिकारशाही, हुकूमशाही, लष्करशाही आणि फॅसिझम या साऱ्या प्रकारांत `विरोधकांचं निर्दालन, संहार' आणि सत्तेचं केंद्रीकरण हे सामाईक आहे हे खरंच. तरीही फॅसिझम अन्य तीन प्रकारांपेक्षा वेगळा ठरतो. कारण एकाधिकारशाही, हुकूमशाही, लष्करशाही यांत सत्तेच्या बाजूनं फार तर एखादा कंपू, अत्यल्पसंख्य गट असतो, त्याला जनतेचा पाठिंबा नसतो. तर फॅसिझमला  जनतेतल्या बहुसंख्याकांपैकी मोठ्या गटाचं, विशेषतः उच्च वर्गीय-उच्च मध्यमवर्गीय-उच्च वंशीय लोकांचं  पाठबळ असतं. दुसरं, फॅसिझममध्ये सत्ता प्राप्त करण्याचा मार्ग क्रांती, बंड किंवा उठाव हा नसून जनमत-निवडणूक-लोकशाही हाच असतो. मात्र फॅसिस्ट याच लोकशाही मार्गात असत्य, अफवा, बनावट हल्ले यांच्या वापरातून जनतेत विवक्षित अल्पसंख्य- भिन्न धर्मीय गटाविरुद्ध द्वेष भिनवतात व त्या द्वेषाला `राष्ट्रभक्ती' ठरवून ३५-३८ टक्के जनतेची मतं मिळवून १०० टक्के सत्ता मिळवतात. सत्ता हस्तगत झाल्यावर ती ३५-३८ टक्के जनता अल्पसंख्य-भिन्न धर्मीय गटाच्या द्वेषाने पेटत राहील अशा अफवा-खोट्या बातम्या पेरत राहतात, बहुसंख्याक गटाचा स्वधर्म-स्ववंश-स्वसंकृती यांचा अभिमान-गर्व चेतवत राहतात, जेणेकरून जनमताचा काही भाग कायम स्वतःच्या बाजूने राहील. बहुसंख्याकांचा स्वधर्म-स्ववंश-स्वसंस्कृती यांचा   गर्व धुमसता ठेवण्यासाठी ते देशसेवेचा व सांस्कृतिक कार्याचा बुरखा घातलेली शिस्तबद्ध-निमलष्करी स्वरूपाची संघटना चालवतात. द्वेषमूलक अफवा  पसरवण्यासाठी, स्वपक्षाच्या सत्कार्याच्या व विरोधकांच्या दुष्कृत्यांच्या खऱ्या-खोट्या बातम्यांच्या प्रसारासाठी, ते प्रसारमाध्यमं बगलेत घेतात व निधीसाठी कॉर्पोरेट्स यांना ते हाताशी धरतात. हिटलरनं हेच केलं आणि लाखो लोकांची कत्तल केली. पण, ती कत्तल तो करू शकला कारण ३५/३८ टक्के जर्मन जनतेनं `ज्यूं'चा द्वेष करत हिटलरला निवडून दिलं आणि ज्यूंची कत्तल होत असतानाही, जर्मनी पराभूत होत असतानाही हिटलरवर अढळ विश्वास ठेवून त्याच्याविरुद्ध उठाव केला नाही. म्हणून, ज्यूंच्या कत्तलीचं आणि दुसऱ्या महायुद्धातील नरसंहाराचं पाप केवळ हिटलर-मुसोलिनी यांचं नसून त्यांना मतदान करून सत्तारोहणापर्यंत नेणाऱ्या ३५/३८ टक्के मध्यम-उच्चवर्गीय जनतेचंही आहे. याचा अर्थ असा की, फॅसिझममध्ये घडणाऱ्या क्रूर घटनांचं पाप केवळ एखाद्या नेत्याचं नसतं, तर ते किमान ३५/३८ टक्के जनतेचं असतं. कारण त्या ३५/३८ टक्के जनतेनं फॅसिस्टांच्या निमलष्करी विषारी संघटनांना राष्ट्रभक्त मानलेलं असतं, त्यांच्या अफवांवर विश्वास ठेवून अल्पसंख्य परधर्मियांचा द्वेष धरून फॅसिस्ट नेत्याला निवडून दिलेलं असतं !! एकंदरीत, त्या जनतेमुळेच लोकशाही आणि राष्ट्रभक्तीची झूल पांघरून फॅसिझम मुसंडी मारतो! स्थापनेच्या शताब्दी वर्षात असलेला `फॅसिस्ट' हा पक्ष, संस्थापक मुसोलिनीच्या पाठोपाठच नाहीसा झाला, पण तरीही त्यांची चर्चा कधीही थांबली नाही आणि थांबणार नाही. कारण सत्ता संपादनाची व सत्ताकारणाची त्यांची कार्यपद्धत अधिक यशस्वीपणे राबवणारे हिटलर सारखे नेते नव्याने जगभर तयार होत गेले आणि होत आहेत. नेत्यांची, पक्षांची, देशसेवा कम सांस्कृतिक कार्य करणाऱ्या संघटनांची - शाखांची नावं बदलतात. देशांची नावं बदलतात, देशानुसार बहुसंख्याक-अल्पसंख्याक धर्मांची नावं बदलतात, काळानुसार प्रसार माध्यमांचे प्रकारही बदलतात. रेडियो ऐवजी टीव्ही, पत्रकांऐवजी व्हॉट्सप.....  फॅसिझम मात्र न बदलता तसाच टिकून काही महिन्यात शंभरी पूर्ण करेल..... एकच बदललं, स्थापना करताना मुसोलिनीनं पक्षाचं नावच `फॅसिस्ट' ठेवलं होतं, निदान तेवढ्या बाबतीत तरी तो प्रामाणिक होता. आता मात्र कोणताही नेता तेवढा देखील प्रामाणिक नाही. कोणीही नेता स्वतःला फॅसिस्ट म्हणवत नाही. सबब, प्रत्येकानं आपापल्या देशातल्या नेत्याचं, त्याच्या पक्षाचं आणि देशसेवा कम राष्ट्रभक्ती कम सांस्कृतिक कार्य करणाऱ्या  संघटनेचं `वास्तवातलं' नाव ओळखणं भाग आहे!! कारण न ओळखणारे लोक फॅसिस्टांना निवडून देणाऱ्या ३५/३८ टक्क्यांमधले पापी ठरतील ! सारांशानं, मुसोलिनी आणि विशेषतः हिटलरनं सत्तेपर्यंत पोहोचण्यापासून स्वतःच्या मृत्यूपर्यंत जे काही केलं ते इतकं व्यापक आणि विविधांगी आहे, की फॅसीझमचा अर्थ एकेका शब्दात तर सोडा, थोडक्यात वर्णन किंवा व्याख्या करूनही, सर्वांना समजणं अवघड आहे. त्यापेक्षा फॅसिझम म्हणजे `हिटलरने जे केले ते' असा अर्थ वास्तवाशी निगडित असल्यामुळे कोणालाही समजणं अगदी सोपं आहे ..... अर्थात, `वास्तव' या शब्दाचा अर्थ मात्र `उमजलेला' असला पाहिजे.......               लोकेश शेवडे  १२/११/२०२०    १४:०० फिनिक्स