Wednesday, January 22, 2014

भाजपचा `दिग्विजय'


                                                                भाजपचा `दिग्विजय' 

 माझा एक सख्खा मित्र ज्योतिषी आहे तर दुसरा तितकाच सख्खा मित्र अत्यंत बुद्धीप्रामाण्यवादी. ते दोघे एकमेकांचे कट्टर वैरी. मी आपला दोघांनाही सांभाळून असतो  दुसऱ्याला खोटे पाडण्यासाठी, दुसऱ्याच्या तत्वांची हुर्यो करण्यासाठी दोघेही सतत आटापिटा करत असतात. `विज्ञान, मानवी बुद्धी आणि लॉजिक' किती तोकडे पडते ते पहिला सांगत फिरत असतो. याउलट पाहिल्याचे भाकित चुकून  कधी खरे ठरले तरी दुसरा त्यात `लॉजिक'च कसे होते, घडले ते `विज्ञानानुसारच' कसे घडले ते पटवू पाहतो. मी आपला सामान्य माणूस असल्यामुळे त्यातले काहीच कळत नाही, त्यामुळे मी फक्त त्या दोघांचे भांडण व त्यांचे एकमेकांसमोर येणे टाळायचा प्रयत्न करत असतो. दुसऱ्याच्या समोर मी कधीही मान्य केले नसले तरी एक गोष्ट मात्र कबूल करावी लागेल की अधून-मधून पहिल्याने वर्तवलेले अत्यंत उटपटांग भविष्य खरे ठरलेले पाहून मी सुध्दा चक्रावलो आहे. उदा. मागे एकदा त्यानं असं भाकित केलं की "भारतीय जनता भ्रष्टाचार निर्मुलनासाठी मेणबत्त्या लावेल".  तेंव्हा मला कळेच ना की भ्रष्टाचार आणि  मेणबत्त्यांचा संबंध काय? पण नंतर जेंव्हा भारतभर लोक `मी अण्णा हजारे' असे छापलेल्या टोप्या लावून मेणबत्त्या लावून फिरले तेंव्हा मात्र भाकित खरे ठरले हे पटले. दुसरा मात्र म्हणत राहिला की "अशा माकडचेष्टांनी भ्रष्टाचार निर्मुलन होणे अशक्य आहे  आणि प्रत्यक्षात झालाही नाही." वगैरे वगैरे. `भ्रष्टाचार' भले न जावो पण तरीही `मेणबत्त्यांचे' भाकित खरे ठरले होतेच ना!! त्यामुळे मला याला भाकित म्हणावे की `लॉजिक' हा उलगडा मात्र झालाच नाही. असेच पूर्वी एकदा पहिल्याने सांगितले की, यापुढे भारतात अत्यंत गरीब जनतादेखील फक्त कोट्याधीश -अब्जाधीशांना आमदार-खासदार म्हणून निवडून देईल. तेंव्हाही दुसऱ्याने या त्याच्या भाकिताला  त्याच वेळी आक्षेप  घेऊन म्हटले,"अरे,  निवडणुकीत तिकीट मिळवण्यापासून मतदानापर्यंत इतके पैसे खर्चावे लागतात की कोट्याधीश-अब्जाधीशच निवडणूक जिंकू शकतो.  त्यामुळे तुझे भाकित हे भाकित नसून निव्वळ `लॉजिक' आहे!!". त्यानंतरचे निवडणुकीचे निकाल पाहून भाकित की लॉजिक हा माझा गोंधळ मात्र दूर झालाच नाही.

काल हा माझा पहिला मित्र अचानक समोर उभा ठाकला. आणि म्हणाला, "एकवीसशे चौदा साली भारतात निवडणुका होतील, त्यात भ्रष्टाचार, महागाई आणि विकास हे प्रमुख मुद्दे असतील. आणि त्यावर्षी भाजप दिग्विजय सिंहांचा पुतळा उभारेल." आतापर्यंत हा माझा मित्र पुढच्या पाच-सात वर्षांचं भविष्य सांगत असे, याखेपेस त्यानं थेट शंभर वर्षांची मजल मारली हे पाहून मी दचकलोच. जेंव्हा नजीकच्या काळाचे भविष्य तो सांगत असे तेंव्हा त्यात `लॉजिक' असण्याची खात्री नसली तरी तशी शक्यता मलादेखील वाटत असे. पण याखेपेला शंभर वर्षांचा प्रश्न असल्यामुळे मला यात लॉजिक नसून शुध्द भविष्य आहे याची बालंबाल खात्री पटली. एकदाचा माझ्या मनातला गोंधळ दूर झाल्यामुळे बऱ्यापैकी आत्मविश्वासानं मी दुसऱ्याकडे गेलो आणि त्याला हे भविष्य सांगून टेचात म्हणालो,
 "आता बोल, यावर तुझं काय म्हणणं आहे?" त्यानं तोंडातल्या तंबाखूची पिचकारी मारून पुन्हा नेहमीचं उत्तर दिलं,
"हे कसलं भविष्य? सिम्पल लॉजिक आहे?" भविष्यावर मारलेल्या  पिचकारीचा मला रागच आला आणि जरा आक्रमकपणे म्हणालो,
"नुसत्या पिचकाऱ्या मारून काही होत नाही. तुला ते लॉजिक खुलासेवार मांडून सिद्ध करावं लागेल." यावर त्यानं पाणी घेऊन खळखळून चूळ भरली आणि म्हणाला,
"अरे, आता दोनहजार चौदा साली निवडणूक होणार आहे. दर पाच वर्षांनी निवडणूक होते, याचा अर्थ विसावी निवडणूक शंभर वर्षांनी, एकवीसशे चौदा साली असेल इतकं साधं गणित आहे. दुसरं, भारतीय जनता स्वत:च इतकी भ्रष्ट आणि नादान आहे, की भ्रष्टाचार, महागाई हे कुणाचीही कितीही सरकारं आलीत तरी भारतातून कधीच जाणार नाही आणि विकास कधीही होणार नाही. त्यामुळे हे मुद्दे शंभर वर्षांनी देखील चालूच असतील, हे सांगायला काही ज्योतिषशास्त्र लागत नाही `लॉजिक' लागतं." त्याचं उत्तर मला काहीसं पटायला लागलं. म्हणून स्वत:ला सावरत त्याला निरुत्तर करणारा माझा जमालगोटा प्रश्न विचारला,
"पण मग भाजप त्यावेळी पुतळा का उभारेल?"
"ती त्यांची पध्दतच आहे. आता नाही का सरदार पटेलांचा पुतळा उभारणार आहेत ते?" तो दात कोरत म्हणाला. त्याचं म्हणणं मला आणखी थोडं पटायला लागलं. पण मन पराभव पत्कारेना. म्हणून विचारलं,
"पण पुतळा ते कॉंग्रेसच्या नेत्याचा उभारतील हे कशावरून?"
"आतासुध्दा ते सरदार पटेलांचा, म्हणजे कॉंग्रेसच्या नेत्यांचाच उभारताहेत की. !!" हे मला बऱ्यापैकी मान्य झालं, पण पूर्ण नाही.
"पण कॉंग्रेसच्या नेत्यांचाच पुतळा उभारणार असतील तर मग इंदिराजींपासून सोनियाजींपैकी कोणाचा का नाही?"
"नाही. ते शक्य नाही. गांधी नाव असलेल्या व्यक्तीचा पुतळा ते उभारत नाहीत त्यांच्या शिष्यांचा उभारतात. आतादेखील ते महात्मा गांधींचा पुतळा कुठे उभारताहेत? गांधीजींच्या शिष्याचा, म्हणजे सरदार पटेलांचा उभारताहेत. गांधीजींचा नव्हे."  माझ्या शंका फिटत आल्या होत्या. तरी एक प्रश्न विचारल्या शिवाय राहवेना म्हणून विचारलं,
"पुतळेच उभारायचे असतील तर भाजप स्वत:च्या पक्षातल्या नेत्यांचे का नाही उभारत?"
"पुतळा उभारावा अशा लायकीचे नसतील कदाचित कोणी त्यांच्यात. मग काय करतील बिचारे? पण ते जाऊ दे, मुद्दा असा की ज्योतिष-बितीष सगळं थोतांड आहे. माहिती आणि लॉजिकचा वापर करून हे लोक पुढे काय घडेल ते ओळखतात आणि सर्वात महत्वाचं असं आहे की शंभर वर्षांनी काय घडणार आहे ते तपासायला तू, मी आणि तो भंपक ज्योतिषी असणार आहोत कुठे?"
हे ऐकून मीच पुतळ्यासारखा थिजलो...............
 लोकेश शेवडे

No comments:

Post a Comment